Aarti Solanki Video : ‘फॅट टू फिट’ जर्नीमुळे बरीच चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. तब्बल ५० किलो वजन कमी करून आरतीने स्वतःला सिद्ध केलं. वजनावरून अपमान करणाऱ्यांची एकप्रकारे आरतीने बोलतीच बंद केली. आजवर आरतीने तिच्या विनोदी अभिनयशैलीने नाटक, मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र काही कालावधीनंतर आरती सिनेसृष्टीपासून दूर गेली. कारण त्या काळात आरतीला अनेक कठीण प्रसंगांना समोर जावं लागलं.
सिनेसृष्टीत काम करत असताना सततचा अपमान तिला सहन करावा लागावा होता. नुकतीच आरतीने ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात नुकतीच आरतीने हजेरी लावली होती. यावेळी तिने कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. यावेळी बोलताना एक किस्सा सांगत आरती म्हणाली, “सततचा अपमान हा होतंच होता, एका वेळेनंतर माझी सहन करण्याची क्षमता संपली, त्यादरम्यान मला बाहेरून कामही येत होती. तेव्हा माझा एका कार्यक्रमाचा चेक येणार होता. पहिल्या सीझनचा दुसरा अर्धा भाग झाला. सुरुवातीला पहिला सिझन झाला तेव्हा परिस्थिती खूपच वाईट होती. माझी एक मैत्रीण आहे दीपाली गुजराथी म्हणून ती आणि तिचा नवरा असे ते दोघे मला येण्याजाण्याचे पैसे द्यायचे.”
आरती पुढे म्हणाली, “त्या कार्यक्रमाचा पहिला सिझन झाला, मग दीड सिझन झाला, त्यावेळेला माझे १४ हजार रुपये येण्याचे बाकी होते. ही २०१०ची गोष्ट आहे. तेव्हा सगळ्यांचे चेक निघाले. आणि सेटवर सगळ्यांचे चेक आणून दिले जायचे. माझा चेक मात्र आणून दिला नाही. तेव्हा मी विचारलं माझा चेक, यावर मला उत्तर मिळालं, हरवला. तेव्हा मी विचारलं, ‘मग काय करायचं?’ त्यावर ती चॅनलची ep म्हणाली, ‘हरवला, पैसे गेले’.”
आरती पुढे किस्सा सांगत म्हणाली, “पैसे गेले हे ऐकून मला धक्काच बसला. आता पैसे गेले तर मी १४ हजार रुपये देणार कसे. दीड सिझन झाला, तसं पेमेंट खूप ही नव्हतं, जे चॅनेलने ठरवलं होत तेच आम्हाला देण्यात यायचं. तेव्हा मला माझ्या एका दादाने सांगितलं की, ‘तू एक मेल टाक की असं असं घडलं आहे.’ हे ऐकून मी त्या ep ला फोन केला, ‘मेल टाकू का कंपनीला, की असं असं माझा चेक हरवला आहे’, हे ऐकल्यावर ती म्हणाली, ‘थांब थांब, तुला मी कळवते कुठे मेल वगैरे करायचा आहे’. त्यानंतर लगेचच पाच मिनिटात तिचा फोन आला की, ‘तुझा चेक मिळाला आहे, मी देते.’ अशा खूप गोष्टी माझ्याबरोबर घडल्या आहेत. अगदी उठता बसता माझा अपमान व्हायचा.”