सध्या सर्वत्र ओटीटीवर ‘हिरामंडी’ या सीरिजची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सीरिजला सध्या सर्वत्र चांगलाच प्रतिसाद मिळत असून या सीरिजमधील अभिनेत्रींचीही बरीच चर्चा रंगताना दिसत आहे. या सीरिजमध्ये वहिदा ही भूमिका साकारत असलेली संजीदा खान हीदेखील या सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच संजीदा शेखने एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते. यावेळी “घटस्फोटानंतर ती स्वतःला भाग्यवान समजत आहे. आपले हृदय तोडणाऱ्या आणि बदनामी करणाऱ्या जोडीदारापासून अंतर राखणे चांगले आहे”, असे म्हटले होते.
अभिनेत्रीच्या या व्यक्तव्यानंतर तिचा पूर्वाश्रमीचा पती आमिर अलीने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी आमीर अली म्हणाला की, “कुणाचाही अपमान करणाऱ्यातला मी नाही. मी व संजीदा आम्ही पाच वर्षांपासून एकत्र नाही. त्यामुळे संजीदा शेख कदाचित घटस्फोटानंतर आयुष्यात घडलेल्या इतर घटनेबद्दल बोलत असावी”.
आमिर अलीने ‘न्यूज18’ला सांगितले की, “ती आणि मी एकमेकांबद्दल जे काही बोलतो ते आम्हा दोघांबद्दलच असेल असे नाही. आता जवळपास पाच वर्षे आम्ही एकत्र नाही आहोत. लग्न मोडणे आणि घटस्फोटानंतर मी खूप वाईट काळातून गेला होतो. त्यामुळे आता मी याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “संजीदा शेखबरोबरचे माझे नाते ही खूप जुनी गोष्ट आहे. जी आता संपली आहे. आम्ही विभक्त होण्याच्या त्या काळात मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आणि माझ्याबरोबर काय घडले? हे मला माहीत आहे. पण त्याबद्दल मला आता कुणावर चिखलफेक किंवा टीका करायची नाही. विशेषतः ज्यांच्याशी माझे नाते आहे”.
दरम्यान, आमिर अली आणि संजीदा शेख हे एकेकाळी टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले, पण २०२२ मध्ये घटस्फोट झाला. त्याला एक मुलगीही आहे. अभिनेत्रीने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या व आमिर अलीबद्दलच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते.