‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत पोहोचले. अनिरुद्ध या पात्रामुळे मिलिंद यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय मिलिंद यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. गेली अनेक वर्ष मिलिंद गवळी अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. सोशल मीडियावरही मिलिंद बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मिलिंद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्या ३४व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोला खास शुभेच्छा दिल्या आहेत. (Milind Gawali Anniversary Post)
बायकोबरोबरचे फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत त्यांनी असं म्हटलं की, “एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार सुरु आहे. आज आमच्या लग्नाला ३४ वर्ष पूर्ण झाली. माझ्या बहिणीने शेगावच्या गजानन महाराजांकडे नवस केला होता, माझा भाऊ मिलू जर दहावी पास झाला तर मी त्याला शेगावला दर्शनाला घेऊन येईन आणि कदाचित शेगावच्या गजानन महाराजांमुळे मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ४७ टक्के मार्काने उत्तीर्ण झालो. अकरावीला गेलो. आई म्हणाली की, जळगावला देशमुखांच्या घरचं लग्न आहे. त्या लग्नाला जाऊन आपण मिलूचा नवस फेडायला शेगावला जाऊ. मी म्हणालो मला नाही यायचं जळगाव बीळगावला”.
“आई म्हणाली नवस आहे तो तर फेडावाच लागतो. पहाटे आमची एसटी जळगावला पोहोचली. लग्न घरी पोहोचलो आणि समोर एक अतिशय सुंदर मुलगी मला दिसली. आईला म्हटलं की, ती लांब केसांची लाल ड्रेस मधली जी मुलगी आहे तिच्याशी मला लग्न करायचं आहे. आयुष्यभर आईने माझे हट्ट पुरवले, तसाच हा सुद्धा हट्ट तिने पुरवला. आईने लगेच तिच्या घरच्यांना सांगितलं मला ही मुलगी सून म्हणून पसंत आहे. मुलांचं लग्नाचं वय झालं की आपण या दोघांच्या लग्नाचा विचार करुया”.
“माझे आई वडील दोघेही अतिशय प्रेमळ आहेत हे सगळ्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना खात्री होती आपली दिपूली त्या घरात सुखात राहील. मुलगा मोठा झाल्यावर काय ना काहीतरी काम धंदा करेलच, पण त्यांना कुठे कल्पना होती, की मुलगा भविष्यात डोंबाऱ्याचा खेळ करत करत गावगाव भटकत राहणार आहे. २६ मे १९९० साली आमचं लग्न झालं. आज त्याला ३४ वर्ष पूर्ण झाली. त्या वेळेला बिचाऱ्या दिपाला कल्पनाही नसेल एका कलाकाराबरोबर संसार करायचा म्हणजे किती खडतर प्रवास असणार आहे”.
पुढे ते म्हणाले, “अगदी डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्यांसारखाच मी मराठी सिनेमांमध्ये काम करत करत सातारा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, बेळगाव, पुणे, नाशिक, बीड, लातूर, संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी चित्रीकरण करत होतो. आपला नवरा सतत फिरत राहणार आहे याची त्या बिचारीला कल्पनाच नव्हती. आजही गेली साडेचार वर्ष घरदार सोडून ठाण्यामध्ये राहते आहे. कुठल्याही परिस्थितीत सांभाळून घेत असते”.
“एका कलाकाराबरोबर आयुष्य काढणं म्हणजे काय साधी सरळ गोष्ट आहे का?, स्थिरता, सुरक्षा नसताना , सतत हसत खेळत प्रसन्न राहून मला ती साथ देत राहिली. मी पण हा प्रवास तिच्या साथीने तिच्याबरोबर करत आलो आहे. तिची साथ नसती तर इतक्या लांबचा पल्ला गाठूच शकलो नसतो. ३४ वर्षाचा एकत्र प्रवास साधा-सरळ सोपा तिच्यासाठी नव्हता. मला भक्कम साथ दिल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे आणि ३४व्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिपा तुला खूप खूप शुभेच्छा”. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.