‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आई म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर. या मालिकेमुळे तिचं नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते. मालिकेमुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे. मधुराणीचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. ‘कवितेचं पान..’ हे तिच्या कार्यक्रमाचं नाव असून बऱ्याच कवींच्या मुलाखती आणि त्यांच्या कविता या माध्यमातून तिने लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.(madhurani prabhulkar talk on indian culture)
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे समाजातील विचारसरणी बदललेली पाहायला मिळते. अरुंधती जशी स्वावलंबी, कणखर, कर्तृत्वान दाखवण्यात आली आहे. अगदी मधुराणीही तशीच कणखर आणि स्पष्टवक्ती आहे. तिच्या सुमधुर आवाजाने ती चाहत्यांना आपलसं करते. ‘छापा-काटा’ या कार्यक्रमाच्या मुलाखतीत तिने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.
त्या कार्यक्रमात तिला विचारण्यात आलं होत की, ”विचार पुढे घेऊन जाणाऱ्या महिला म्हणतात खूप वेळा बाईपण, स्त्रीत्व जास्त होत यामुळे पुरुष दबला जातो. या सगळ्यात पुरुषही रडतो याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?” यावर मधुराणी स्पष्ट उत्तर देत म्हणाली, ” मग चांगलं आहे की पुरुष दबला तर काय हरकत आहे. स्त्रियांनीच दबून राहायचं का? पुरुषांनीही दबलंच पाहिजे. त्याशिवाय स्त्रीचं दुःख कसं कळेल? बास झालं की तुमची ट्यावट्याव इतकी वर्ष आता तुम्ही जर तुमच्यात बदल नाही केलेत तर स्त्रिया फाट्यावर मारणार तुम्हाला हे आता मान्य करा”.
या पुढे ती म्हणाली, “स्त्री आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली आहे. आता ती आहे तशी तिला स्वीकारलं नाही आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल नाही केले तर लग्नसंस्था मोडकळीस येणार आहेत. आता तुम्हाला नवीन पद्धतीने या संस्थेकडे बघायला पाहिजे तर ती टिकणार आहे. लग्नसंस्था नाही टिकली तरी चालेल मोडूदेत त्यातून नावीन्य निर्माण होणार. पुरुषांनी स्त्रियांच्या बरोबरीने काम केलं तरच चांगला समाज तयार होईल”. मधुराणीने तिचं अगदी स्पष्ट मत मांडलं होतं.