छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसतं. त्यातील अनिरुद्ध देशमुख हे नकारात्मक पात्रं विशेष लोकप्रियता मिळवत आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचं तर प्रेक्षक बरंच कौतुक करताना दिसतात. पण ते साकारत असलेल्या पात्राचा तितकाच द्वेषही केला जातो. स्वतः मिलिंदही यापात्राबाबत बऱ्याचदा लिहिताना दिसतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर या पात्राबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या मालिकेतील एक सीन शेअर करत त्यांनी अनिरुद्धबद्दल भरभरून लिहीलं आहे. (milind gawali share a post related anirudh character)
मिलिंद नेहमी वैयक्तिक आयुष्यातील क्षणांसह इतर कामाच्या ठिकाणचेही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी सेटवरील एक सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो शेअर करत त्यांनी साकारत असलेल्या अभिरुद्धबद्दल लिहिलं आहे. या मालिकेत सध्या विविध वळणं येत आहेत. मालिकेत आरोहीबरोबर घडलेला प्रसंग आणि आता त्यावर अनिरुद्धने मांडलेलं मतं यामुळे अनिरुद्ध नेमका कसा आहे?, याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. तसाच प्रश्न मिलिंद यांना देखील पडला होता. याबाबतचं उत्तर त्यांनी कॅप्शनमध्ये दिलं आहे.
मिलिंद लिहीतात, “Good over Evil, अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असं मत मांडतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो का ?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे. काही परिस्थितीमध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो. सगळ्यांना अचंबित करतो. मी पण ज्या वेळेला स्क्रिप्टवाचतो त्यावेळ नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य येते, मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात. मनातल्या मनात नमिता वर्तकला धन्यवादसुद्धा म्हणत असतो. पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हव्या. योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी”.
मिलिंद पुढे लिहितात, “मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण एखादा पोलिसवाला कितीही भ्रष्ट असला तरी असं म्हटलं जातं की रेप, मर्डर, ड्रिंक आणि ड्राईव्ह, ड्रग्स अशा केसेसमध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही पैसे खात नाही. अशा गुन्हेगाराला तो कधीही साथ देत नाही. कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या सीनमध्ये ज्यावेळेला तो आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्धची एक नव्याने ओळख होत जाते आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात. पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात. प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे”, असं लिहिल आहे.
या पोस्टवर नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनीही कमेंट करत आपलं अनिरुद्धबाबतच मत मांडलं आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘इतके एपिसोड्स झाल्यावर सगळ्यांच्या वागण्याचे अंदाज येतात पण नेहमी माझे अंदाज हा अनिरुद्ध देशमुख चुकवतो, आता मला सर्वात जास्त अनिरुद्धच आवडायला आणि पटायला लागला आहे’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मला या मालिकेतील अनिरुद्ध पात्राचा तिरस्कार आहे. त्याचा अभिनय किती दमदार आहे हे यावरून कळतं”, असं लिहीत मिलिंद यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. पण दुसऱ्या बाजूला ही मालिका बरीच लांबवली जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकही ही मालिका कधी संपणार असल्याचे प्रश्न कमेंट करून विचारत आहेत.