‘आई कुठे काय करते’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण आलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका बरेचदा ट्रोलिंगच्या कचाट्यातही अडकली आहे. मालिकेत अरुंधतीचा खडतर प्रवास मालिका सुरु झाल्यापासून पाहायला मिळत आहे. मालिकेत अरुंधतीच्या नवऱ्याचे म्हणजेच आशुतोष केळकरच्या मृत्यूने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढवलं आहे. मालिकेत अरुंधती सतत रडताना दिसली. याबाबत तिने इंस्टाग्रामवरुन पोस्टही शेअर केली होती. (Madhurani Prabhulkar On Shooting)
बारा तास सतत शूट करुन सलग १०-१२ दिवस रडण्याचे सीन केल्याचा अरुंधतीला तिच्या खऱ्या आयुष्यातही त्रास झाला. अरुंधती हे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. मधुराणीने नुकतीच ‘मिरची मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना सलग चित्रीकरण केल्यानंतर त्याचा कलाकारांच्या खऱ्या आयुष्यावरही किती परिणाम होतो याबाबत तिने भाष्य केलं आहे. मधुराणी यावेळी बोलताना ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चित्रीकरणाचं उदाहरण देत म्हणाली, “खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकेतवर होतो. मला हातच राखून काम करता येत नाही. मी त्या भूमिकेत घुसते. ते चांगलं आहे का वाईट? हे मला माहित नाही. पण मला कधी-कधी असं वाटतं, आपल्याकडे ती ऑन-ऑफ करण्याची कला नाही आहे का? पण तिच माझी खासियत आहे. मी अशी आहे आणि असंच मला करता येतं”.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “आशुतोष गेल्या त्यानंतरचा ट्रॅक होता तेव्हा मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते. म्हणजे सलग रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाइलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होत होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं. आता मी पुन्हा बरी आहे”.
पुढे मधुराणी म्हणाली, “एक-दोन दिवस मला सुट्टी होती त्यादरम्यान मी घरी गेले होते. माझ्या बहिणीकडे गेले होते. तिथे माझी आई होती. माझ्या बहिणीला बरं नव्हतं म्हणून मी तिला मदत करायला गेले होते आणि मीच जाऊन झोपले. त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. नंतर मला मग माझ्या एका मित्राने सांगितलं की, काही प्रमाणत तू ही त्या ट्रॉमातून गेली आहेस. भावनिक दृष्ट्या तू तुझ्या प्रवासातूनही गेली आहेस. त्यामुळे तू तुझ्या आईला समजावून सांग की, ही झोप मला गरजेची होती. मालिकेचं काम करताना तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. सतत तुम्ही त्या चक्रात असता. कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यायला हवे, असं मला वाटतं, सगळ्या कलाकारांनी कधीना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या चार वर्षांच्या अनुभवातून शिकले”, असं म्हणत मालिकेत काम करतानाचा तिचा अनुभव शेअर केला.