२१व्या शतकात वावरत असताना स्त्रियांना समाजामध्ये किती सन्मान मिळतो? हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आज कुटुंबातही एखादं जोडपं वावरत असताना काही चूक घडली तर त्या स्त्रिलाच जबाबदार धरतात. दोन व्यक्तींनी लग्न केल्यानंतर नात्याला गालबोट लागलं तरीही दोष स्त्रीलाच. याचबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकरने भाष्य केलं आहे. मधुराणी ज्या पिढीत वाढली त्या पिढीतील समाजव्यवस्था कशी होती?, लग्नाची व्याख्या तेव्हा काय होती?, डेटिंग केल्यानंतर निर्णय लादणं म्हणजे काय असायचं? याबाबत तिने सुंदर विचार मांडले. (Madhurani prabhulkar talk about marriage system)
आरपारला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीला लग्नसंस्थेबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “पितृसत्ताक संस्थेने स्त्रीची अवस्था फार गंमतशीर करुन टाकली आहे. मुलगी म्हणून मी मोठी होताना बॉलिवूडचे जे काही चित्रपट पाहिले त्यात ‘मेरे ख्वाबो मैं जो आए’ अशी वगैरे गाणी होती. माझ्या पिढीला तेव्हा हेच वाटत होतं की, वयात आल्यानंतर आपल्याला कोणी तरी स्वप्नातला राजकुमार भेटणार. मग त्याच्याशी लग्न करायचं. झालं आयुष्य पूर्ण सेट”.
आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती
“पण त्या काळात त्या मुलीला कोणीच विचारलं नाही की, बाई गं तुला काय आवडतं?. तुझं काय म्हणणं आहे?. इतक्या नाजूक वयात आम्ही निर्णय घेतले. कारण तेव्हा असंच होतं की, जो आवडेल, ज्याच्याशी आपण डेट करु त्याच्याशीच लग्न केलं पाहिजे. हा तेव्हा नियमच होता. कारण चार लोकांना कळालं तर ते काय म्हणतील?. पण आजच्या पिढीला हे काय माहितच नसेल. आता डेटिंगचे खूप प्रकार आले आहेत. आमच्यावेळी ज्याच्याबरोबर डेट कराल त्याच्याशीच लग्न करायचं. समाज कसा चालतो?, जग कसं चालतं? काहीही माहित नसताना आमच्या पिढीचे ते दोघं एकत्र येतात, लग्न करतात आणि त्यांच्यावर निर्णय लादले जातात”.
आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी करतेय शूट, नेहमी सलाईन लावते अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती
“पुढे नातं घेऊन गेलंच पाहिजे. जर नातं पुढे जात नसेल तर त्यात स्त्रीचाच कायतरी दोष आहे, आदर्श स्त्री म्हणून कुठे तरी कमी पडते असं बोललं जातं. एका विशिष्ट पिढीने ही घुसमटलेली समाजव्यवस्था पाहिली आहे. आमचं छान चाललंय, आम्ही मस्त आहोत याची जाहिरात करणारे काही कपल असतात. पण आतमध्ये काय चाललं आहे? हे बाहेर समाजाला कळतच नाही. हे त्या दोघांनाच माहित असतं. नात्यामध्ये जर एक व्यक्ती खूश नसेल तर दुसरा तरी खूश कसा असणार?. घुसमट फक्त स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही होते”. मधुराणीने तिच्या या विचारांमधून अनेक स्त्रियांच्या मनात सुरु असलेली घुसमट उघडपणे मांडली.