मनोरंजन सृष्टीत सगळ्यात लोकप्रिय आणि जुनं माध्यम म्हणजे नाटक. अनेक विषयांवर भाष्य करणारी अनेक नाटकं रंगभूमीवर आली आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजना बरोबरच समाज प्रबोधन करण्याचं महत्वाचं काम ही या नाटकांमधून केलं जात. सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेलं असच एक नाटकं म्हणजे ‘सफरचंद’. अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या सह अन्य कलाकारांची दमदार भूमिका असलेलं नाटकं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं आणि याचीच पोचपावती म्हणून या नाटकाने ३३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत प्रथम पारितोषिकासह बाजी मारली आहे.(Safarchand Marathi Drama)
मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’ ही नाट्य कलाकृती सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी या सिद्धहस्त दिग्दर्शकानं या नाटकाचं निगदर्शन केलं आहे.
फिरता रंगमंच, नेत्रसुखद नेपथ्य, वातावरणाला साजेसं मधुर संगीत, यातून जबरदस्त नाट्यानुभव प्रेक्षकांना मिळतो आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हे नाटक सध्या चर्चेचा विषय ठरतंय.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे या पारितोषिकाची घोषणा केली आहे. या नाटकाला रुपये सात लाख पन्नास हजाराचा पुरस्कार मिळणार आहे. आतापर्यंत एकूण २१ पारितोषिक पटकवणाऱ्या सरगम आणि अमरदीप संस्थेच्या ‘सफरचंद’ या नाटकाने झी नाट्य गौरव, मटा सन्मान, माझा पुरस्कार, सांस्कृतिक कलादर्पण, महाराष्ट्र शासन अशा विविध व्यासपीठावर जोरदार बाजी मारली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील यश आमच्या संपूर्ण टीमसाठी आनंददायी असल्याची भावना निर्माता,दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे.(Safarchand Marathi Drama)

‘सरगम’ आणि ‘अमरदीप’ निर्मित, ‘कल्पकला’ प्रकाशित, ‘सफरचंद’ या नाटकात एक वेगळा विषय मांडला असून ‘सर्वधर्मसमभाव’ हा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या ‘सफरचंद’ नाटकाने सगळ्याच बाबतीत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे.