सध्या ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट अधिक चर्चेत आहे. या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदूकोण, प्रभास, कमल हसन, दिशा पटानी हे प्रमुख भूमिकांमध्ये पहायला मिळाले आहेत. अमिताभ वयाच्या ८०व्या वर्षीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अमिताभ यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडचे शहनशाह म्हणूनदेखील त्यांना ओळखले जाते. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे ते होस्टिंग करताना दिसतात. अशातच त्यांच्याबद्दलच्या अनेक अपडेट आता समोर येत आहेत. त्यांच्या नवीन चित्रपटातील ‘अश्वत्थामा’ या भूमिकेचेही कौतुक होत आहे. (M.M. faruqui on amitabh bachchan )
इतक्या चित्रपटांमध्ये यशस्वी भूमिका केल्यानंतरदेखील चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याने मात्र अमिताभ यांच्याबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला होता. ‘मिर्झापुर ३’मधील दद्दा त्यागी म्हणजेच बॉलीवूडमध्ये ‘लिलीपूट’ नावाने ओळखले जाणारे अभिनेते एम. एम. फारुकी यांच्याबद्दल अनेक अपडेट समोर आल्या आहेत. करियरच्या सुरुवातीला ते स्वतःला दुर्भागी समजायचे. ‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमिताभ यांच्याबरोबर चित्रपट करण्याबद्दलचे अनेक अनुभव शेअर केले आहेत.
त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी जुगार खेळत होतो तेव्हा सुभाष घई यांचा फोन आला. त्यांनी मला ऑफिसला भेटायला बोलावलं. त्यावेळी माझ्याकडे वांद्राला जाण्यासाठीदेखील फोटो नव्हते. त्यामुळे मी ज्या लोकांबरोबर जुगार खेळत होतो त्यांच्यातील एकाने मला तिथे सोडले. त्यावेळी सुभाषजीनी मला सांगितले की मी एक चित्रपट बनवत आहे. त्यामध्ये अमिताभ मुख्य भूमिकेत असतील आणि तुम्हाला खलनायकाची भूमिका करायची आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी त्यावेळी अनेक प्रोजेक्टवर काम करत होतो. त्यांनी मला सांगितले की माझा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तुमचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होता कामा नये. असे होत नसेल तर तुम्हाला हा चित्रपट सोडावा लागेल. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन मी इतर चित्रपट सोडून दिले आणि त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले”.
त्यानंतर त्यांनी सांगितले की, “अमिताभ यांची तब्येत ठीक नसल्याने सुभाष यांनी तो चित्रपट केलाच नाही. तेव्हा मी अमिताभ यांना म्हणालो होतो की माझ्याबरोबर अभिनय करण्याचा प्रयत्न करु नका”.
त्यानंतर फारुकी यांना खूप अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याच्या अनेक संधी मिळाल्या मात्र ते चित्रपट होऊ शकले नाहीत. ‘बंटी और बबली’ या चित्रपटासाठीदेखील त्यांना विचारण्यात आले होते त्यावेळी निर्मात्यांना फारुकी यांनी सांगितले की, “मी दुर्भागी आहे,अमिताभ यांच्याबरोबर माझा चित्रपट बनत नाही आणि तुमचादेखील चित्रपट बनणार नाही”. मात्र असे न होता हा चित्रपट बनला आणि लोकांनाही तो आवडला.