पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात ७२ मंत्र्यांसह शपथ घेतली. केंद्रात वक्फ बोर्ड रद्द करण्यासंदर्भात हालचाली सुरु असताना, राज्यात मात्र युती सरकारनं ‘वक्फ’ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी तब्बल दहा कोटींच्या निधीची तरतूद केल्याप्रकरणी चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चांवर भाष्य करत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. केतकी नेहमीच सामाजिक व राजकीय मुद्यांवर आपले परखड मत मांडत असते. अशातच अभिनेत्रीने सरकारवर निशाणा साधत नोटावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं म्हटलं आहे. (Ketaki Chitale slams Maharashtra Government)
हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली की, “धक्कादायक बातमी वाचून मी उठली आहे, यावर काय बोलावं काही कळत नाही आहे. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिली नाही, त्यांच्या बळकटीसाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देत आहेत. तुम्ही बधीर आहात की, आम्हाला बधीर करुन सोडणार आहात?. मी नेहमीच म्हणत होते की, लोकसभेत कोणाला मत द्यायचं ते ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्नच नव्हता. माझे पंतप्रधान कोण असावेत, हे बघून मी मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती? हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासूनच बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करुन सोडलं आहे, असं केतकी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे”.
पुढे ती म्हणाली आहे की, “देशभरात वक्फ बोर्ड रद्द व्हावा यासाठी मोर्चे निघत असताना, तुम्ही वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये मंजूर करत आहात. आधीच तुमचं तिन तिघाडी सरकार आहे. तुम्हाला तुमच्या बाजूला आता हिंदूही नको आहेत का? एकजण पुन्हा काकांकडे जाणार आहे, काका काका माझं चुकलं मला माफ करा. दुसरी व्यक्ती काय करतेय तर, तीन चाकी सायकल चालवता येत नाही म्हणून तीन चाकी रिक्षा चालवायला जाणार आहे का?. तिसऱ्याचं तर काय राजीनामा स्विकारलाच जात नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारे राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रीपणा करणार आहात का?. किती संख्यानं तुमची मतं कमी करणार आहात हे तुमचं ध्येय आहे का? हा विधानसभेसाठी तुमचा निर्णय आहे का?”.
“वफ्फ बोर्डच्या बळकटीकरणासाठी पैसे देत आहात, हे नेमकं काय आहे, हे सरकारनं सांगावं. ‘वक्फ’ बोर्डानं आधीच हिंदूंची इतकी जमीन बळकावली आहे. देशात सर्वात जास्त मालिकी असणाऱ्यांपैकी वक्फ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यांना रद्द केलंच पाहिजे. वफ्फ बोर्डमधील माणसं आपल्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की ही जमीन आमची आहे तर तुम्ही बोंबा मारत रस्त्यावर येऊ, कारण वफ्फ बोर्डचा निर्णय सुप्रीम वा हायकोर्टात चालत नाही. संघाला तोडलं आहेत आणि सनातनीही तोडत आहात”, असंही केतकी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. सर्व राजकारण्यांना बोल लगावत ती महाराष्ट्राचे नाव बदलण्याचा सल्ला देत आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये रडत आक्रोश व्यक्त करताना दिसत आहे.