‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते’ नवा या मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत अचानक सहा वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळत आहे. अचानक पुढे सरकलेल्या या कथानकाने साऱ्यांच लक्ष वेधलं आहे. मालिकेत आनंदीने भावासाठी आणि सार्थकच्या आईने घातलेल्या अटींसाठी सार्थकपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदी मालिकेत दिसत नसतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. (man dhaga dhaga jodate nava)
‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेचा नवा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीलाच सार्थक असं म्हणताना दिसत आहे की, गेल्या सहा वर्षात मी पहिल्यांदाच तुमच्या नावाने देवाला फुल वाहायला विसरलो आनंदी. त्यानंतर सार्थक फुलवाल्याकडे गुलाबाचं फुल मागतो. पण फुलं संपलेली असतात असं फुलवाला सांगतो. तितक्यात तिथे एका पात्राची एन्ट्री होते. तिच्या पुष्पगुच्छातील एक फुल काढते आणि “एक फुल चालेलं?”, असं ती सार्थकला विचारते. तेव्हा सार्थक ते फुल घेतो आणि पैसे देतो. पण सुखदा पैसे नाकारते आणि म्हणते, “एक स्माइल द्या आणि थँक्यू म्हणा”.
त्यावेळी सार्थक तिला फक्त थँक्यू म्हणतो. त्यावर सुखदा विचारते आणि स्माइल?. सार्थक म्हणतो, “काही कारण वगैरे पाहिजे ना हसायला”. तेव्हा सुखदा म्हणते, “एकदा हसून तर बघा. आनंदी व्हाल”. मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षक कमेंट करत आनंदीबाबत विचारपूस करताना दिसत आहेत. “आनंदी कुठे गेली तीच चांगली होती”, “आनंदी पुन्हा ये”, “आनंदी कुठे आहे”, “आनंदी सार्थकची जोडी मस्त आहे”, “आनंदी व सार्थकमुळे मालिका बघायला छान वाटत”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून मयुरी देशपांडे घराघरांत पोहोचली. आता मयुरी बऱ्याच वर्षांनी ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत सुखदा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सहा वर्षांनंतर या मालिकेतून पुन्हा एकदा मयुरी मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. मयुरीच्या मालिकेतील एन्ट्रीवर प्रेक्षक आनंदीबाबत चर्चा करताना दिसत आहेत.