सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत म्हणून आवर्जून एका कलाकाराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवला. चित्रपट, मालिकांसोबत रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. हमीदाबाईची कोठी हे व्यावसायिक रंगभूमीवरील एक गाजलेलं आणि महत्वाचं नाटक. या नाटकात अशोक मामांसोबत नाना पाटेकर हे देखील होते. या नाटकादरम्यानची एक आठवण मी बहुरूपी या पुस्तकात अशोक मामांनी शेअर केली आहे.(Nana Patekar Ashok Saraf)
हमीदाबाईची कोठी नाटकाचे बरेच प्रयोग झाले. दरम्यान एका गावात त्यांचा प्रयोग होता त्या गावात थिएटर म्हणाव अस काहीच नव्हत. एक सॉ मिल होती, तिथे प्रयोग करायचा होता. समोर खुर्च्या ठेवलेल्या. नाटक सुरू झाल आणि स्टेजवर खाली बसून नट मंडळी बोलू लागली आणि समोरच्या खुर्च्यावर बसलेल्या प्रेक्षकांना काही दिसेना. पहिल्या पाच मिनिटांमध्ये त्यांनी पडदा पाडला. याचा किस्सा सांगताना अशोक मामा म्हणाले, प्रयोग लावणाऱ्या लोकांचं म्हणणं पडलं की आम्ही सगळ नाटक उभ राहूनच कराव म्हणजे काही अडचण येणार नाही. विजयाबाईंच्या मते ते शक्यच नव्हतं. हे बोलण चालू असताना बाहेर गडबड वाढतेय हे आमच्या लक्षात आलं. लोक बोंबाबोंब करायला लागले होते.
पहा नानांनी कस काढलं अशोक मामांना संकटातून बाहेर (Nana Patekar Ashok Saraf)
मला माणसं ओळखत असल्यामुळे माझ्या नावानं शिमगा सुरू झाला. नानाच्या लक्षात आलं की प्रेक्षक चिडले तर मला टार्गेट करणार. त्यानं माझा हात पकडला आणि म्हणाला, ‘अशोक, चल माझ्याबरोबर.'(Nana Patekar Ashok Saraf)
थिएटरच्या मागच्या बाजूने नानांनी अशोक मामांना बाहेर काढलं. बाहेर असलेला सगळा चिखल तुडवत ते दोघही निघाले. काही अंतरावर तारेचं कुपण होतं. तेथून बाहेर पडले. दरम्यान थिएटरमध्ये घडलेल्या आक्रोशाच वर्णन करत मामा म्हणाले, आम्ही निघाल्यावर अक्षरशः मारामारीला सुरुवात झाली होती. लोकांनी खुर्च्याबिर्च्या तोडून टाकल्या होत्या. साडेसात फुटांचा माझा फ्लायर (पुट्ट्याचा पुतळा ) बनवलेला होता त्याच्याही चिंध्या केल्या गेल्या. आमच्या नाटकाच्या गाडीखाली आमचा ड्रायव्हर झोपला होता. त्याला बाहेर काढून मुस्कटात मारली. गाडीच्या काचाबिचा कोणी फोडल्या नाहीत हे नशीब.

आम्ही दोघं रस्त्यावर पोचलो तर तिथे चिटपाखरूही नव्हतं. एक सायकलरिक्षा दिसली तशी नानानं ती थांबवली. रिक्षावाला वयस्क होता. आणि रस्ता चढणीचा. त्याला आम्हा दोघांचं वजन झेपेना. नानानं त्याला उतरवलं, मागे माझ्या बाजूला बसवलं आणि स्वतः रिक्षा ओढू लागला. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो. नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं. नाटक न झाल्याचा सगळा राग माझ्यावर काढला असता. नानानं रिक्षा ओढत मला रेस्टहाऊसवर आणलं. एका खोलीत बंद करून ठेवलं. मग आपल्या अंगावरचे कपडे काढले. फक्त हाफपँटवर आणि डोक्याला रुमाल बांधून पुन्हा बाकीच्या लोकांच्या मदतीसाठी थिएटरच्या दिशेनं निघाला. काय काळीज आहे या माणसाचं! फणस आहे तो. बाहेरून जितका काटेरी तितकाच आतून मधाळ, गोड.(Nana Patekar Ashok Saraf)
नाना निघून गेल्यानंतर मात्र अशोक मामांना चैन पडेना, शेवटी ते एकटे बाहेर पडले, आपल्या सहकाऱ्यांचं काय झालं असेल ही चिंता त्यांची पाठ सोडत नव्हती. चालत थोड्या अंतरावर जाताच एक रिक्षा समोरून येताना मामांना दिसली. नाटकातल्या सगळ्या बायका त्यात होत्या. ते पाहुन आल्या पावली मामा पुन्हा रेस्टहाऊसवर परतले. अशोक मामा पुढे म्हणाले, त्या रात्री आम्ही पहाटे तीन वाजता त्या गावातून निघालो. पुढे एक पोलीस व्हॅन, मध्ये आमची बस, मागे आणखी पोलीस, अशा शाही इतमामामध्ये निघालेली आमची पहिलीच नाटक कंपनीची बस असेल. या किस्स्यामुळे नाना आणि मामा यांच्यात असणाऱ्या जीवापाड आणि घट्ट मैत्रीच्या नात्याचं उदाहरण देणं वावगं ठरणार नाही.
