‘हिरामंडी’ या लोकप्रिय सीरिजमधून चर्चेत आलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. येत्या २३ जून रोजी सोनाक्षी तिच्या कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरला होत आहेत. यावर सोनाक्षीने तिची प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र स्वत:च्या लग्नाच्या अनेक चर्चांनंतर सोनाक्षीने मौन सोडलं आहे. याबद्दल बोलताना ती तिच्या लग्नाच्या प्रश्नांकडे फारसे लक्ष देत नाही. तसेच त्यांच्या लग्नाशी इतरांचा संबंध नसावा असंही म्हटलं.
सोनाक्षी सिन्हाने DWA ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “मला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र मी नेहमीच एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. सर्वप्रथम, माझ्या लग्नाशी कोणाचाही संबंध नसावा. दुसरे म्हणजे, ही माझी निवड आहे. मग मला कळत नाही की, लोक इतकी काळजी का करतात?. माझ्या आई-वडिलांपेक्षा लोक मला माझ्या लग्नाबद्दल जास्त विचारतात. म्हणूनच मला ते खूप गंमतीशीर वाटते. आता मला त्याची सवय झाली आहे. त्याचा मला त्रास होत नाही. लोक माझ्या लग्नाबद्दल उत्सुक आहेत, आम्ही त्याबद्दल काय करु शकतो?”
आणखी वाचा – घायल शेर लौट आया है! ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त टीझरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
तसेच सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत असं म्हटले आहे की, “मी माध्यमांमध्ये जेवढे वाचले आहे तेवढेच मला माहीत आहे. माझ्याकडे अद्याप याविषयी कोणतीही माहिती नाही. लोक मला सोनाक्षीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. पण मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहित आहे. यावर मी एवढेच सांगू इच्छितो की, आजकालची मुले त्यांच्या पालकांना विचारत नाहीत, ते फक्त येऊन सांगतात. पण माझे आशीर्वाद कायमच तिच्याबरोबर असतील”.
‘हीरामंडी’च्या प्रमोशनदरम्यान सोनाक्षीने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये ती लग्नासाठी उत्सुक आहे असं वक्तव्य केलं होतं. यामुळे तिच्या व इकबल झहीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २०२२मध्ये ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. सोनाक्षीला सलमानने चित्रपटांमध्ये लाँच केले होते. त्याचबरोबर झहीर इक्बालने पदार्पण केलेला ‘नोटबुक’ हा चित्रपटाला सलमान खानची निर्मिती होती. तसेच झहीर इक्बाल व सोनाक्षी यांची पहिली भेट सलमानच्या एका पार्टीत झाली होती.