‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत ऐश्वर्या व सारंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकताच रणदिवे कुटुंबात संगीत सोहळा पार पडला. यावेळी मालिकेतील कलाकार थिरकलेले दिसले. शिवाय ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची टीमही या संगीत सोहळ्याला उपस्थित होती. (Gharoghari Matichya Chuli Kelvan Special)
ऐश्वर्या व सारंग यांच्या लग्नसोहळ्याची मालिकेत जय्यत तयारी सुरु असताना नुकतंच या दोघांच्या महाकेळवनाचा थाटमाट पुण्यात घातला गेला. यावेळी मालिकेतील संपूर्ण टीमने श्रीमंत दगडूशेठ गणपती पुणे येथे दर्शन घेत या प्रवासाला सुरुवात केली. रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, उदय नेने, प्रतीक्षा मुणगेकर हे कलाकार या महाकेळवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ऐश्वर्या व जानकीची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
जानकी ऐश्वर्याला असं म्हणते की, “अगं अगं जाऊबाई…माझ्या धाकट्या दीराला फसवलंस का गं? का गं? का गं?” यावर प्रत्युत्तर देत ऐश्वर्या असं म्हणाली की, “अगं अगं जाऊबाई डिफेक्टिव्ह पिस पदरात दिलास का गं? का गं? का गं?” यांची जुगलबंदी ऐकून सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. मालिकेत जानकीची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारत आहे. तर ऐश्वर्याच्या भूमिकेत प्रतीक्षा मुणगेकर पाहायला मिळत आहे.
मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. मेहंदी, हळदी, संगीत सोहळ्यासाठी मालिकेतील कलाकार पारंपरिक पोशाखात दिसले. तर महिला कलाकारांनी नऊवारी साडी व आकर्षक अशा दागिन्यांना पसंती दिली. ऐश्वर्याचं लग्न अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं असून आता तिचं लग्न नेमकं सारंगबरोबर होणार की सौमित्रबरोबर होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.