बॉलिवूड मनोरंजन सृष्टीत अनेक पुरस्कार सोहळ्यांपैकी फिल्मफेअर हा अतिशय मानाचा व महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराचं यंदाचं ६९वं वर्ष आहे. यंदाचा हा ६९वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे येत्या २७ व २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. दरवर्षी मुंबईत या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. परंतु, यंदा हा सोहळा गुजरात टुरिजमच्या साहाय्याने गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचं नातं जवळ जवळ १०० वर्ष जुनं आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, चित्रपट, गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली”.
भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2024
हेही वाचा – ‘मिर्झापुर ३’, ‘महाराणी ३’, अन् ‘आश्रम ४’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज, कुठे पाहता येणार?
“निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती. फिल्मफेअर अॅवॉर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर-दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हेदेखील महत्त्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम-आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही”.

“१०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या? माफ करा आम्हाला!”. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.