‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमुळे मालिकेतील कलाकार लोकप्रियतेस पोहोचले. मालिकेनंतर काही कलाकारांनी सिनेविश्वात उत्तम कामगिरी करत यश मिळवले तर काहीजण हे यश संपादन करु शकले नाहीत. यामध्ये संजय गांधी यांचेही नाव आहे. या मालिकेत त्यांनी नैतिकचे वडील महेंद्र प्रताप सिंघानिया यांची भूमिका साकारली होती. २००९ ते २०१२ दरम्यान ते मालिकेत दिसले होते. त्यांचे पात्र दादाजी या नावाने प्रसिद्ध होते. तीन दशकांपासून शोबिझचा भाग असूनही त्यांच्याकडे घराचे भाडे देण्यासाठी पैसे नाही आहेत. याबाबत एका मुलाखतीत त्यांनी खुलेपणाने भाष्य केले आहे. (Yeh Rishta Kya Kehlata Hai Sanjay Gandhi)
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम संजय गांधी ‘झनक’ मध्ये त्यांचा ट्रॅक पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कलाकाराचे आयुष्य असेच असते. काम करताना सर्व काही ठीक आहे. पण जेव्हा काम हातात नसतं तेव्हा अचानक सर्वकाही संपुष्टात येते. सध्या सुरु असलेल्या शोचा भाग असूनही मी त्याच वाईट टप्प्यातून जात आहे”.
संजय गांधी म्हणाले, “जेव्हा मी झनकमध्ये सामील झालो तेव्हा मला सांगण्यात आले की सुरुवातीला फक्त २० सीन शूट करायचे आहेत. त्यानंतर दोन महिन्यांचा ब्रेक असेल. मग ते कथेचा महत्त्वाचा भाग असतील . मात्र, आत्तापर्यंत मी ९ महिन्यांत फक्त २० दिवस शूट केले आहे आणि माझा ट्रॅक पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत आहे. मे महिन्यापासून मला त्यांच्याकडून कोणतेही अपडेट मिळालेले नाही आहेत. त्यांना माझी गरज नसती तर ते मला सांगू शकले असते. मी आणखी काही प्रकल्प हाती घेऊ शकलो असतो. अभिनेता होण्याचा हा सर्वात कठीण भाग आहे”.
आर्थिक संकटाबद्दल बोलताना अभिनेते म्हणाले, “शहरात स्वत:ला सांभाळण्यासाठी मला पैशांची गरज आहे. आणि माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कोविड-१९ दरम्यान मी माझी बचत संपवली होती. मी आता अंधेरी येथे भाड्याच्या घरात राहतो आणि माझे भाडे देण्यासाठी माझ्या मित्रांकडून पैसे उधार घेतो. मीरा रोड येथील माझे घर गहाण ठेवण्याच्या मार्गावर मी आहे. मला पैशाची नितांत गरज आहे. मला एक नवीन प्रकल्प हवा आहे”.