‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून या कार्यक्रमाने स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या विनोदी अंगाने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. (Mhj Artist Leave The Show)
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. या कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरेने कायमची एक्झिट घेतली असल्याचं समोर आलं आहे. गौरव हा हास्यजत्रेच्या प्रेक्षकांचा लाडका होता. गौरवने या कार्यक्रमातून बाहेर पडला असल्याची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसह दिली. गौरवच्या जाण्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.
गौरवच्या आधीही हास्यजत्रेतील अनेक कलाकार मंडळींनी या शोचा निरोप घेतला आहे. या कलाकारांच्या यादीत विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे (पॅडी), भूषण कडू, ओंकार भोजने आणि आता गौरव मोरे अशा या हास्यजत्रेतील लोकप्रिय व टॉपच्या कलाकारांनी शोला रामराम केला. एकामागोमाग एक कलाकार मंडळी हास्यजत्रेतून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजीचा सूर वेळोवेळी पाहायला मिळाला. असं असलं तरी या कलाकारांना त्यांचे चाहते नेहमीच मिस करताना दिसतात. विशाखा सुभेदार यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागे कारण म्हटलं तर काहीतरी नवीन करायचं होतं, इतकंच आहे”. तर ओंकार भोजनेने ही अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं की, “त्याला वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून तो चित्रपटांकडे वळला”. तर गौरवनेही नवा प्रवास सुरु केल्याने हास्यजत्रा सोडली.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची मोठी संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक नवोदित कलाकारांना या विनोदी अंगाच्या प्लॅटफॉर्मने खूप मोठी संधी दिली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या कलाकारांना एका मुठीत बांधून ठेवण्याचे काम या कार्यक्रमाचे खरे बादशाह लेखक-दिग्दर्शक यांनी केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे लेखक-दिग्दर्शक सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे.