स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या सव्वाचार वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेने आजवर त्याच्या रंजक कथानकाच्या जोरावर खूप मोठा चाहतावर्ग जोडला. आई या जगातील हळव्या विषयावर भाष्य करणारा विषय हाताळत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने आणि कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. तर काही वेळा मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे ही मालिका ट्रोलिंगची शिकार झाली. (Aai Kuthe Kay karte Promo)
अशातच आता सध्या ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत आलेल्या एका मोठ्या ट्विस्टने प्रेक्षकांनाही धक्का दिला आहे. मालिकेत आशुतोष केळकरचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. आशुतोषच्या मृत्यूने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलं आहे. आशुतोषच्या मृत्यूच्या बातमीने अरुंधती पूर्णतः खचलेली दिसली. तर सुलेखा ताईंनी लेकाच्या मृत्यूला जबाबदार धरल्याने अरुंधतीला कांचन देशमुखांच्या घरी पुन्हा घेऊन आली.
आता मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अरुंधती या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अरुंधतीला असलेली गायनाची आवड ही आशुतोषमुळे पुन्हा नव्याने सुरु झाली. आशुतोषमुळे अरुंधती गायनसेवा करण्यास तयार झाली. आता आशुतोष नसताना तिची गाण्याची हिम्मत होत नसल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हेतर यश अरुंधतीला गाण्यासाठी सांगत असतो. मात्र अरुंधती हार मानत मी आता पुन्हा कधीच गाऊ शकत नसल्याचं सांगते.
अरुंधती दुःखातून सावरत पुन्हा एकदा गाण्याला सूर देणार का हे मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे. तर मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मालिका आता कोणतं रंजक वळण घेणार याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर अरुंधतीवर ओढावलेलं संकट पाहून चाहत्यांनीही अरुंधतीबाबत काळजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे.