मनोरंजनसृष्टीत दमदार अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन विश्वात क्षितीने आपला ठसा उमटवला. मालिका, नाटक तसेच चित्रपटातून दमदार अभिनय करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. क्षिती ही मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची लेक आहे. अभिनेते अनंत जोग व अभिनेत्री उज्ज्वला जोग यांची कन्या क्षिती आहे. आई-वडिलांच्या पायावर पाय ठेवत तिने अभिनयक्षेत्रातील तिचा प्रवास सुरु ठेवला. (Kshitee Jog On Mom Dad)
नुकतीच क्षितीने ‘आरपार’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने तिच्या आई-वडिलांबाबत भाष्य केलं. अनंत जोग व उज्ज्वला जोग हे दोघेही बरीच वर्ष एकमेकांपासून वेगळं राहत आहेत. क्षितीने या मुलाखतीदरम्यान ती १८व्या वर्षांपासून एकटी राहत असल्याचा खुलासा केला. अभिनेत्री मुलाखतीदरम्यान म्हणाली, खरं सांगायचं तर हे जेव्हा झालं तेव्हा मी १८ वर्षांची होते. आणि जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा मला खूप आनंद झाला. दोन माणसं एकमेकांबरोबर सतत भांडत आहेत. आणि संपूर्ण घराचं त्यामुळे वातावरण बिघडत असेल आणि ते दोघेही खुश नाही आहेत. बरेचदा काही भांडण ही मिटवण्यासारखी असतात ज्यावेळी एक महिना एकमेकांशी न बोलता ते राहू शकतात, आणि नंतर ते पुन्हा बोलू लागतात. काही भांडण असतात जी मिटवण्यासारखी नसतात. मला हे कधीच पटलं नाही की, ते दोघे दुखी आहेत, आणि त्यांच्यात भांडण होतात म्हणून मी दुखी आहे. त्यापेक्षा सगळे वेगवेगळे राहिले तेव्हा सगळेच आनंदी झाले. आता आम्ही तिघेही नियमितपणे भेटतो. एकत्र जेवायला जातो. बाबा माझ्याकडे येतात तेव्हा आईला वेळ असेल तर तीही येते. कित्येकदा बाबा आईकडे जेवायला जातो. आता हे स्वतंत्र कुटुंब असून ते आनंदी आहे”.
पुढे एक किस्सा सांगत ती म्हणाली, “बरेचदा तालमींमुळे घरी यायला उशीर व्हायचा. मला आता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. त्यांचं त्यांच्या मुलीशी भांडण झालं. मी तेव्हा माझ्या मैत्रिणीला पाठिंबा द्यायला बरोबर आहे, बरोबर आहे असं बोलत होते. तेव्हा ते मला असं म्हणाले, तुला ठीक आहे. तुझे आई-बाबा एकत्र राहत नाहीत. तुला कोणी विचारणारं नाही. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. मी त्यांना म्हटलं, बरोबर आहे. आता माझ्या आई-वडिलांपैकी कोणालाही फोन करुन विचारा मी कुठे आहे. त्यांना माहित असतं. कारण मी एक जबाबदार मुलगी आहे आणि ते जबाबदार पालक आहेत”.
यापुढे क्षिती म्हणाली, “काहीजण बरेचदा सांत्वन करायला यायचे. मी खूप आनंदी आहे, मला सांत्वनाची गरज नाही. मी आजही आईशी तितकीच भांडते जेवढी पूर्वी व्हायची. बाबाचा आणि माझा स्वभाव मिळताजुळता असल्याने आमची भांडणही उच्च स्तरावरची असतात. मला कोणत्याच गोष्टींचा बाऊ केलेला आवडतं नाही. मी माझ्या आयुष्यात त्या दरम्यान काही चुका केल्या असतील तर त्याला मी स्वतः जबाबदार आहे. मी अशी वागले याचा अर्थ मी विभक्त कुटुंबातून आले आहे म्हणून असावं असं होत नाही. आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचं याची जबाबदारी आपण कधी घेणार हे कळायला हवं. आई-वडिलांवर याचा आरोप करणं चुकीचं आहे. विभक्त कुटुंब पूर्वी फार कमी असायचे त्यामुळे याचा बाऊ केला जायचा नाही. आता हे प्रमाण अधिक झालं आहे. मी वाईट मार्गाला लागले कारण माझे पालक विभक्त आहेत असं काहीच नाही. मी चुका माझ्या माझ्या केल्या आहेत. याला माझे पालक जबाबदार नाहीत”.