स्टार प्रवाह वाहिनीने आजवर प्रेक्षकांच्या भेटीला अनेक लोकप्रिय मालिका आणल्या आहेत आणि त्या मालिकांना प्रेक्षकांनीदेखील डोक्यावर घेतले आहे. अशा अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. आधी टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल असणारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टॉप ५च्या शर्यतीतूनदेखील बाहेर पडली होती. मात्र, सततचा उतार झाल्यानंतर आता मालिकेच्या कथानकाने एक अनपेक्षित वळण घेतले.
मालिकेत मोठा ट्विस्ट दाखवण्यासाठी आता आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यावर आता स्टार प्रवाह वाहिनीचे बिजनेस हेड सतीश राजवाडे यांनी उत्तर दिलं आहे. नुकतंच ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात त्यांनी या मालिकेच्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी ते असं म्हणाले की, “आई कुठे काय करते? मालिकेच्या नवीन प्रोमोला प्रेक्षक इतकं बोलले आहेत हे मान्य आहे. पण तो त्यांचा हक्कच आहे. आम्ही त्यांना तो हक्क देतो कारण हे तेच प्रेक्षक आहेत, ज्यांनी ही मालिका इतकी सुपरहिट बनवली. जर ते मालिका डोक्यावर घेऊ शकतात, तर ते आम्हाला बोलूही शकतात. पण आम्हाला खात्री आहे की, आम्ही मालिकेला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहोत. त्यामुळे जितक्या लोकांनी आम्हाला नावे ठेवली आहेत, त्यांना मी हे सांगू इच्छितो की, तुम्हाला अजून प्रगल्भ मालिका द्यायला आम्हाला हे वळण घेणे गरजेचे होते.”
यापुढे ते असं म्हणाले की, “प्रत्येकाला आई असते. पण आईला जेव्हा आईची गरज लागते तेव्हा कुणीच नसतं. आई ही व्यक्ती प्रत्येक कुटुंबासाठी खंबीरपणे उभी असतेच. प्रत्येकाला आईची गरज असते, पण आईला जेव्हा कुणाची तरी गरज लागते तेव्हा कुणीच नसतं. आता मालिकेतील आईला गरज आहे. त्यामुळे हरकत नाही. आज लोकांना वाटत असेल की मालिकेत फार चुकीची दाखवले जात आहे. पण आम्हाला थोडा वेळ द्या. मालिकेत आईच्या पाठीशी सासूच्या रूपात आई उभी राहणार आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या नात्याला कलाटणी देणारी मालिका आता सुरु होणार असेल तर मला संपूर्ण महाराष्ट्राला विचारायचं आहे की तुम्ही मालिका बघणार की नाही?”
दरम्यान, यापुढे सतीश राजवाडे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आगामी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबद्दल व मालिकेच्या कथानकाबद्दलही मुक्तपणे संवाद साधला. तसेच प्रेक्षकांना ही नव्याने सुरु होणारी मालिका पाहण्याचे आवाहनदेखील केले आहे.