मराठी मनोरंजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठीसह बॉलिवूडलाही वेड लावले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचे आजही अनेक प्रेक्षकावर गारुड आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘सैराट’मध्ये नागराज मंजुळे यांनी नवख्या चेहऱ्यांना संधी देत रुपेरी पडद्यावर आणले होते.
या चित्रपटातील आर्ची-परशा यांच्यासह सल्या-बाळ्या व इतर काही कलाकारदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. या चित्रपटात ‘लगंड्या’ म्हणून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे तानाजी गालगुंडे. ‘सैराट’मध्ये “परशा आर्ची आली रे आली” असं म्हणणाऱ्या तानाजी गालगुंडेने ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांत छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्राबरोबरच तानाजी पट्टीचा जलतरणपटूदेखील आहे. याशिवाय तो त्याच्या गावी शेतात चांगलाच रमतो.
तानाजी हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. यापैकी त्याच्या काही पोस्टमधून त्याच्या गावची खास झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्याने कालच शेअर केलेल्या काही फोटोमध्ये तो शेळ्या चरायला घेऊन गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच त्याच्या आणखी एका पोस्टमध्ये तो हरभरा काढून म्हशीला खाऊ घालत आहे. तसेच त्याने हरभऱ्याच्या शेतातले काही खास फोटोही शेअर केले आहेत. पावसात भिजताना, बैलगाडी चालवताना, द्राक्षाच्या बागेतले काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. तसेच त्याने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कोबी काढताना दिसत आहे.
आणखी वाचा – सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”
दरम्यान, तानाजी हा ‘सैराट’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटात झळकला. यानंतर त्याने ‘गस्त’, ‘झुंड’, ‘माझा अगडबम’, ‘फ्री हिट दणका’, ‘एकदम कडक’ या चित्रपटात काम केले. तसेच ‘घर बंदूक बिरयानी’ व ‘नवरदेव बी.एस.सी.अॅग्री’ या चित्रपटातही मुख्य भूमिका केली होती. त्यामुळे आता अभिनेता कोणत्या नवीन भूमिकेतून किंवा नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची त्याचे चाहते वाट पाहत आहेत.