ramanand sagar son anand death : रामानंद सागर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ‘रामायण’सारखी हिट टीव्ही मालिका करणारे रामानंद सागर यांचा मुलगा आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पवन हंस स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंदच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर आनंदच्या मृत्यूची माहिती दिली. आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाने सागर कुटुंबाचे एक प्रभावी शतक संपुष्टात आले आहे.
रामानंद सागर यांच्या कुटुंबीयांनी आनंद सागर यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आणि शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमचे प्रिय वडील आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनाबद्दल अत्यंत दु:खाने आणि अत्यंत खेदाने कळवत आहोत. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजता पवन हंस हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत”.
आणखी वाचा – आई सोडून गेली, नवऱ्याने १० लाख उडवले आणि…; अखेर राखीच्या अश्रूंचा बांध फुटला, एकटेपणाबाबत म्हणाली…
आनंद रामानंद सागर यांनी त्यांचे वडील रामानंद सागर यांच्याप्रमाणे टीव्हीच्या दुनियेत अभूतपूर्व काम सुरु ठेवले. त्यांनी २००८ मध्ये ‘रामायण’ हा टीव्ही शो बनवला, ज्यामध्ये गुरमीत चौधरीने श्री राम आणि देबिना बॅनर्जीने आई सीतेची भूमिका केली होती. या मालिकेतील ‘राम आणि सीता’च्या भूमिकेतून गुरमीत आणि देबिना घराघरात प्रसिद्ध झाले. रामानंद सागरचे आणखी अनेक उत्कृष्ट प्रकल्प त्यांनी नव्या पद्धतीने प्रसारित केले. आनंदने वडील रामानंद सागर यांचा वारसा जतन करुन पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आणखी वाचा – “भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही”, रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, “कुठल्याच आईला…”
आनंद रामानंद सागर चोप्रा यांनी त्यांच्या वडिलांच्या ‘सागर आर्ट्स’ या प्रॉडक्शन हाऊसमधील क्रिएटिव्ह, प्रोडक्शन आणि नवीन प्रोजेक्ट्सचे मॅनेजमेंट हे कामही उत्तम प्रकारे हाताळले. आता त्यांच्या निधनाने संपूर्ण सागर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ऑगस्ट २०२५ मध्येच आनंद सागर यांचा भाऊ आणि रामानंद सागर यांचा दुसरा मुलगा प्रेम सागर यांचे निधन झाले होते. त्याने ‘विक्रम और बेताल’सारखे हिट शो तयार केले होते. त्यांनी इतर अनेक पौराणिक मालिकाही केल्या.




