मनोरंजन विश्वात गेल्या काही काळात अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले आहेत आणि या विवाहबंधनात अडकलेल्या काही जोडप्यांचा काडीमोडही झाला आहे. यातील काही जोडप्यांनी अनेक वर्ष आपला संसार टिकवला. काही जोडप्यांच्या संसारात कुरबुरी असल्याच्या चर्चा आहेत. आता प्रसिद्ध गायिकेने एका लोकप्रिय व सुप्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाबाबत मोठा दावा केला आहे. मागील १८ वर्षांपासून सुरू असलेल्या संसारात या दोन्ही कलाकारांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे दावा या गायिकेने केला आहे.
हे प्रसिद्ध जोडपे दुसरे-तिसरे कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या व धनुष हे आहे. या जोडप्याने २०२२ मध्ये घटस्फोटाची घोषणा करत त्यांचे नाते संपले असल्याचे जाहीर केले. खरं तर, १७ जानेवारी २०२२ रोजी धनुषने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते की, तो व पत्नी ऐश्वर्या लग्नाच्या १८ वर्षानंतर वेगळे होत आहेत. त्याने चेन्नईच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्जही दाखल केला होता. मात्र या दोघांनी घटस्फोटामागील कारण कधीच स्पष्ट केलं नव्हतं. घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यापासूनच दोघं वेगवेगळे राहत आहेत. अशातच आता गायिका सुचित्राने या दोघांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
‘एबीपी’च्या वृत्तानुसार कुमुदम या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने धक्कादायक खुलासा केला असून धनुष व ऐश्वर्या या दोघांनी एकमेकांची फसवणूक केल्याचे सांगितले. धनुष व ऐश्वर्या एकत्र असतानाही ते वेगवेगळ्या लोकांबरोबर डेटवर जात होते, असा दावाही सुचित्राने केला आहे. “धनुषने मला फसवलं, असा आरोप ऐश्वर्या करते आहे. पण तिनेसुद्धा विवाहित असताना धनुषची फसवणूक केली आहे. हा दुटप्पीपणा झाला ना? ऐश्वर्याने धनुषला फसवलं आणि धनुषने ऐश्वर्याला फसवलं. ही एक अशी जोडी आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा विश्वासघात केला आहे”, असं सुचित्रा म्हणाली.
यावर मुलाखतकाराने “इतके गंभीर आरोप तू कोणत्या आधारावर करते आहेस?” असा प्रश्न विचारला असता सूचित्राने सांगितलं की, “ऐश्वर्या व धनुष हे विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तींबरोबर डेटवर जायचे. ते बारमध्ये बसायचे आणि ज्या व्यक्तीला डेट करत आहेत, त्यांच्याबरोबर मद्यपान करायचे.” यावर निवदकाने “डेटवर जाणे ही सामान्य गोष्ट आहे.” असे म्हटले. यावर सुचित्राने “जेव्हा तुम्ही विवाहित असता, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर डेटवर जाणं सर्वसामान्य आहे का?” असा प्रश्नात्मक उत्तर दिले. दरम्यान, “मित्र, जोडीदार आणि पालक म्हणून १८ वर्षे एकमेकांबरोबर राहिल्यानंतर आमचे मार्ग आता वेगळे होत आहेत. आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या”, असं म्हणत त्यांनी घटस्फोट घेतला होता.