‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘का रे दुरावा’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर. शीतलने आपल्या नकारात्मक भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनात तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री लीला म्हणजेच वल्लरी विराजच्या आईची भूमिका साकारत आहे. या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून शीतलची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
अशातच अभिनेत्रीने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. ‘इट्स मज्जा’च्या Caption The Picture या खास सेगमेन्टमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी गणपती बाप्पांबरोबरच्या खास फोटोविषयीची आठवण सांगताना त्यांनी असं म्हटलं की, “आमच्याकडे तीन वर्षे नवसाचा गणपती होता. माझ्या लहान भावाला कोरोना झाल्यामुळे तो आयसीयूमध्ये होता. त्यावेळी माझ्या आईने तो बरा होऊन सुखरूप घरी यावा म्हणून आईने नाव केला होता. त्यामुळे बाप्पा घरी तर आला. पण त्याने खूप परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत पासही त्यानेचं केलं.”
यापुढे शीतल यांनी तिच्या आईबरोबरच्या फोटोबद्दल असं म्हटलं की, “या फोटोमध्ये बाबा नाहीत, फक्त आई आहे. बाबांशिवायचं हा फोटो आहे. आम्ही तिघं भावंडं आमच्या आईची स्वप्ने पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. तळेगावला साईबाबांचे एक मंदीर आहे. आमच्या कुटुंबाची साईबाबांवर भक्ती आहे. त्यामुळे आमची लहानपणापासून तिथे जातो. आमची होळीची सुट्टी ही साईबाबांच्या दर्शनात जायची. तेव्हा तळेगावला साईबाबांचं मंदीर असल्याचं कळताच आम्ही आईबरोबर तळेगावला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर पप्पांची खूपच आठवण आली आणि आम्ही आमच्या काही जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.”
दरम्यान, शीतल क्षीरसागर यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘का रे दुरावा’, ‘एक होती राजकन्या’, ‘आई कुठे काय करते’, ‘माझी तुझी रेशीमगाठ, रमा राघव’ तसेच आता ‘नवरी मिळे हिटलरला’ अशा अनेक मराठी मालिकेतून त्यांनी अभिनयाची जादु दाखवली आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या सकारात्मक व नकारात्मक अशा प्रत्येक भूमिकांनी तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.