Marathi Actress mother passes away : मराठी मनोरंजनसृष्टीतून एक हळवी करणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिच्या आयुष्यात मोठं दुःख कोसळलं असून तिच्या आईचं दुःखद निधन झालं आहे. या घटनेची माहिती स्वतः भाग्यश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’, ‘रमा राघव’ आणि हिंदी मालिका ‘माटी से बंधी डोर’ यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवणारी भाग्यश्री सध्या या तिच्या वैयक्तिक दुःखातून जात आहे. काही दिवसांपासून तिची आई आजारी होती. पण उपचारादरम्यान त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आईसोबतचा एक भावूक फोटो शेअर करत भाग्यश्रीने मनातील भावना सांगितल्या. या पोस्टमध्ये तिने आईबद्दल लिहिलेला भावनिक संदेश सध्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते, “आई! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आईने मला एकही फोन केला नाही. का तर ‘सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही”. अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही. लग्नाला दोन महिने पण झाले नाहीत आणि तू मला सोडून गेलीस हे मला मान्य होत नाही. मला शेवटपर्यंत तुझ्यापाशी रहायचं होत म्हणून मला लग्न नव्हत करायचं. पण तू…, ‘माझी शेवटची इच्छा आहे.”
आणखी वाचा – घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केलं अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप, धक्कादायक सत्य समोर
“तू माझ्यासाठी लग्न कर आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्त केलं आहेस. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी’ खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आईची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्यासाठी किती बरोबर आहे.” यानंतर पुढे ती म्हणते, “तुझ्यासाठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिलं. माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्यासाठी प्रार्थना करायचे. पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणाबरोबर तुझ्या चितेला नमस्कार करत होते.”
“मला तू अशी सोडून जायला नको होतीस.. आईला लेकराचं चांगलाच कळतं हे खरंच. पण तरीही आई तू मला हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल. मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्याप्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे.” भाग्यश्रीच्या या शब्दांनी चाहत्यांसह अनेक कलाकारही भावूक झाले असून सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. आई-लेकीच्या नात्यातील ही भावना सध्या सर्वांच्याच मनाला भिडत आहे.




