मराठी कलाविश्वाला अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री उषा नाईक हे नाव कोणत्याही मराठी रसिकाला नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीत गेली अनेक वर्षे उषा नाईक काम करत आहे. आजवर त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. नृत्यांगणापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास मुख्य अभिनेत्री, चरित्र अभिनेत्रीपर्यंत पोहोचला. चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर उषा नाईक यांनी मालिकाविश्वाकडे आपली पावले वळविली. (Usha Naik Statement)
नुकतीचं उषा नाईक यांनी इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील प्रवासाबद्दल बरंच भाषण केलं. दरम्यान त्यांनी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराबद्दलही भाष्य केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, पण तो अवॉर्ड घ्यायला मी गेले नाही. माझ्या मुलाचे उपचार सुरु होते त्यामुळे डॉक्टरकडे धावा सुरुचं होत्या. आणि त्यामुळे हे सर्व सोडून तिथे जाऊन अवॉर्ड घेणं मला योग्य नाही वाटलं.
पुढे त्या म्हणाल्या, “त्यावेळी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी कलाकारांना घेणं बंद केलं. आम्ही अवॉर्ड देतो पण ही मराठी कलाकार मंडळी अवॉर्ड घ्यायला येत नाहीत. यांना या अवॉर्डची काळजी नसेल तर जाऊदे, असं तेव्हा बोललं जायचं. तेव्हापासून हा अवॉर्ड देणं त्यांनी बंद केलं आणि त्यानंतर पुन्हा हा फिल्मफेअर अवॉर्ड देण्यास रितेश देशमुख सरांनी स्वतंत्रपणे सुरु केलं. तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले होते त्यावेळी तिथेही मी बोलून दाखवलं की, हे फिल्मफेअर अवॉर्ड माझ्यामुळे बंद झालं होतं, ते पुन्हा एकदा रितेश देशमुख सरांनी सुरु केलं”.
पुढे त्या म्हणाल्या, “सिनेसृष्टीत काम करत असताना माझ्यावर भरपूर अन्याय झाले होते. पण ते सर्व माझ्यावरचे अन्याय या ‘एक हजारच्या नोट’ने भरून काढले. जवळजवळ पंधरा ते सोळा अवॉर्ड मला मिळाले. काम करणं हे मला चांगलं माहित होतं. आता अवॉर्ड मिळणं न मिळणं हा काही नशिबाचा भाग नाही तर काही लोकांच्या मर्जीचा भाग आहे. हे मला नंतर नंतर कळत गेलं”.