मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून चिन्मयी सुमित यांची एक वेगळीच ओळख आहे. नाटक, मालिककांसह चित्रपट अशा अनेक माध्यमातून चिन्मयी यांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. २ जून २०१७ रोजी चिन्मयी सुमित यांची मुख्य भूमिका असलेला ‘मुरांबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘मुरांबा’ची गोष्ट तशी प्रत्येकाच्या घरातलीच होती. प्रेमात पडलेल्या, प्रेमाच्या नात्यात गोंधळलेल्या आणि करिअरमध्ये भांबावलेल्या मुलाची अनोखी कथा यारून दाखवण्यात आली होती.
या चित्रपटात सचिन खेडेकर, मिथिला पालकर अमेय वाघ व चिन्मयी सुमित यांच्या भूमिका होत्या. यात आईची भूमिकाही चिन्मयी यांनी साकारली होती. या चित्रपटासाथ चिन्मयी यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. ‘मुरांबा’नंतर अनेक चित्रपट विचारले जातील असं चिन्मयी यांना वाटलं होतं मात्र तसं काहीच झालं नाही आणि हीच खंत चिन्मयी यांनी ‘इट्स मज्जा’च्याअ ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात व्यक्त केली आहे.
याबद्दल चिन्मयी यांनी असं म्हटलं की, “‘मुरांबा’नंतर घरासमोर निर्मात्यांच्या रांगा लागतील असं वाटलं होतं. पण तसं काही होत नाही आपल्याकडे. तर याबद्दल मी माझ्या मुलाला म्हटले की, ‘मुरांबा’ला सात वर्षे झाली. पण या सात वर्षात मी ‘मुरांबा’सारखं काही केलंच नाही. तर याचबद्दल माझा मुलगा मला असं म्हणाला की, “‘मुरांबा’मधील आई ही टिपिकल आई नव्हती”. त्यामुळे तसे चित्रपटच झाले नाहीत. म्हणून ‘मुरांबा’नंतर मी किती चित्रपट केले, यापेक्षा ‘मुरांबा’सारखे किती चित्रपट आले? हादेखील एक प्रश्नच आहे. त्यामुळे तुम्ही एखादे वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी करता तेव्हा त्याच्या आवृत्त्या येत नाहीत”.
आणखी वाचा – घायल शेर लौट आया है! ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त टीझरची चर्चा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “‘मुरांबा’नंतर माझ्याकडे काही आयांच्या भूमिका आल्या. मात्र एकदा आपण काहीतरी इतकं चांगलं करून ठेवल्यानंतर चार पाऊले मागे जायचं का? असा प्रश्न मला वाटतं. मिळालं तर चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे आणि आपण सतत दिसलं पाहिजे हा माझा अट्टाहास कधीच नव्हता. ‘मुरांबा’नंतर ‘मलाल’ नावाचा एक चित्रपट केला याचं मला समाधान आहे. तसेच ‘फास्टर फेणे’ मी अगदी छोटीशी भूमिका केली होती. पण बाकी फारच साधारण चित्रपट आले. त्यामुळे ते नाही केले”.