मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधर हिने आजवर अनेक नाटक, मालिका, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कधी खलनायिकेच्या भूमिकेत तर कधी सोज्वळ भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. अदिती नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. बऱ्याच न पटणाऱ्या मुद्द्यांवर ती स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. वैयक्तिक आयुष्याविषयीदेखील अदिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असते. सध्या अदिती तिच्या आगामी ‘बाई गं’ या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. (Aditi Sarangdhar On Live-in Relation)
कायमच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करत चर्चेत असणाऱ्या अदितीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अदितीने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सध्या चर्चेत असणाऱ्या लिव्ह-इन रिलेशनबाबत तिचं मत काय आहे असा प्रश्न तिला विचारला होता. यावेळी उत्तर देत तिने स्वतःदेखील लिव्ह-इनमध्ये राहिली असल्याचा खुलासा केला. आणि ही प्रथा जुनी आहे असं देखील वक्तव्य केलं.
याचं उत्तर देत अदिती म्हणाली, “सोशल मीडिया आलं त्यामुळे या चर्चा अधिक वाढल्या. पण हा ट्रेंड काही नवीन नाही. सुहास आणि मी दोन-अडीच वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. पूर्वीच्या काळात काही लोकांनी बायका ठेवलेल्या असायच्या पण ती काही नवीन पद्धत नाही. अशा रिलेशनशिपमध्ये राहणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि तशी त्यांची चॉईस आहे. लग्न ही संस्कृती प्रत्येकाने जापायला पाहिजे. जर लग्नासारखी कमिटमेंट तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहू शकता”.
पुढे ती म्हणाली, “आजकाल बऱ्याचश्या मुली या करिअरकडे झुकल्या आहेत त्यामुळे ३५,४०शीत त्या आयुष्याच्या या स्थितीचा विचार करतात. आणि मुलं होऊ न देणे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मुलं होणं ही केवळ जबाबदारी नाही तर एक आर्थिक तडजोड आहे”.