विनोदाच्या परफेक्ट टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सोळंकी सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. आरतीने फॅट टू फिट अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बल ५० किलो वजन तिने घटवलं आणि ती चर्चेत आली. विविध विनोदी भूमिकांसाठी आरती सोळंकीला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या माध्यातून तिने मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.‘एक टप्पा आऊट’, ‘कॉमेडी बिमेडी’, ‘फु बाई फु’ यांसारख्या कार्यक्रमांमधून आरतीने छोटा पडदा गाजवला. मात्र काही काळानंतर आरती सिनेसृष्टीपासून दूर गेली. तिचा सिनेसृष्टीतील वावर कमी झालेला पाहायला मिळाला. याचं कारण आरतीने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दिलं. (Aarti Solanki Struggle)
आरती सोळंकीने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना आरती म्हणाली, “मला एका चॅनेलमधून काढून टाकलं. मला एका चॅनलमधून बॅन करण्यात आलं. त्या दरम्यान मी थोडीशी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यादरम्यान मी काही काळ इंडस्ट्रीपासून दूरही गेले होते. तेव्हा मला काही कलाकारांनी मिळून त्रास दिला होता, त्यामुळे ही जी मला त्रास देणारी कलाकार मंडळी आहेत ती जिथे असायची तिथे मी कामासाठीही जायचे नाही. पण गेल्या दहा बारा वर्षांत असं बरच काही घडलं आहे, ज्याबद्दल मी अद्याप कुठेही बोलले नाही किंवा एखाद्या कलाकारासह असं काही शेअरही केलेलं नाही. त्यामुळे मी इंडस्ट्रीपासून फार लांब गेले. आताही मी स्वतःहून काम शोधायला जात नाही, समोरून काम आलं तर मी ते करायला जाते.
यापुढे बोलत ती म्हणाली, “‘फु बाई फु’ नंतर असं काही माझ्या करियरमध्ये घडलं होत की, मला काम करायची इच्छाच व्हायची नाही. त्यावेळी मी मोठे मोठे प्रोजेक्ट सोडले होते. त्यामुळे मी इंडस्ट्रीतून थोडीशी बाहेर आले आणि फार दिसले नाही.” हा अनुभव शेअर करत आरती सोळंकी म्हणाली की, “मी ज्या चॅनेलमध्ये काम करत होते ते चॅनेल, चॅनेलची माणसं माझ्यावर खूप खुश होती. आणि हाच एक प्रॉब्लेम झाला की, या गोष्टीवर कलाकार खुश नव्हते. चॅनेलच्या साथीने मी बऱ्यापैकी पुढे जात होते, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं मला आमंत्रण असायचं, आणि मी बऱ्यापैकी पुढे जात होते. आज मी त्या चॅनेलचं नाव यासाठी घेणार नाही की नंतर कोणाची मन दुखवायला नको.”
यापुढे बोलत आरती म्हणाली, “आज आरती सोळंकी मला त्या चॅनेलमुळे मिळाली. त्यामुळे मला कितीही वाईट अनुभव आले असले, तरी मी त्या चॅनलबद्दल वाईट बोलूच शकत नाही. त्या चॅनेलने मला बॅन केलं असं नाही आहे, तर मधल्या काही माणसांनी माझ्या बद्दल वाईट सांगितलं होतं त्यामुळे हा गैरसमज झाला होता आणि त्या चॅनलमधून मला बॅन करण्यात आलं. या गोष्टी त्यावेळी जर घडल्या नसत्या तर त्या चॅनेलनेच माझं आयुष्य सेटल केलं असतं आणि मी आज एक कलाकार म्हणून पूर्णपणे सेटल झाले असते. मला कोण काय बोललं, कोणी काय केलं या गोष्टी माझ्या बऱ्याच दिवसांनंतर समोर आल्या.
बॅन केलं हे कळल्यानंतर आरतीची नेमकी प्रतिक्रिया काय होती याबाबत बोलताना ती म्हणाली, “त्या चॅनेलने मला बॅन केलं हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला ही खूप मोठा धक्का बसला. आजवर मी कधीच त्या चॅनेलकडे कसलीच मागणी केली नव्हती, वा माझी कोणत्याच डिपार्टमेंटकडून तक्रार नव्हती आणि म्हणूनच मी चॅनेलची लाडकी झाले होते. त्यावेळेला मी २५,२६ वर्षाचे होते आणि या क्षेत्रात माझा कुणीही गॉडफादर नव्हता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर माझं मत मांडायला मला जमलं नाही. मी मत मांडण्याआधीच डिप्रेशनमध्ये गेले.”