छोटा पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. आजवर शशांकने त्याच्या शांत, सुसंस्कारी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. पडद्यावर त्याच्या समजूतदार, संयमी, शांत भूमिका पाहून तो शांत जरी वाटत असला तरी खऱ्या आयुष्यात तो बऱ्यापैकी स्पष्टवक्ता आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण सोशल मीडियावरून शशांकने कित्येकदा वाचा फोडली आहे. शिवाय त्याने स्पष्टपणे भाष्य करत मुद्दे मांडले देखील आहेत. काही दिवसांपासून शशांक त्याच्यासोबत झालेल्या घोटाळ्याबाबत बोलत होता. (Shashank Ketkar On Big Scam)
याबाबत शशांक केतकरने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर झालेल्या एका घोटाळ्याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं. तसेच याप्रकरणी त्याने संबंधित प्रशासनाला जाबही विचारला आहे.
याबाबत बोलताना शशांक म्हणाला, “मी २०१३ मध्ये मीरा रोडमध्ये एका घराची नोंदणी केली होती. आता त्याला १० वर्ष उलटली आहे. पण १० वर्षात एकही वीट माझ्या मालकीची झालेली नाही”, अशी खंत शशांकने व्यक्त केली आहे.
“इथे बिल्डरला काही मजल्यांची परवानगी मिळाली होती. त्यावर त्याने दहा-वीस मजले बांधले आहेत. मीरा रोड शहरात वीस- वीस मजली इमारत उभी राहते आणि ती कोणाच्या नजरेस पडत नाहीत?” असा सवाल शशांकने उपस्थित केला आहे.
याशिवाय त्याने चित्रपटसृष्टीतील फसवणुकीबाबतही भाष्य केलं, तो म्हणाला, “इतकंच नाही तर चित्रपटसृष्टीतही अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागते. “आम्ही असा सिनेमा देऊ, अशी भूमिका देऊ अशी आमिष दाखवायची. काम पूर्ण करुन घ्यायचे. पैसे पुढच्या टप्प्याचे असतात ते द्यायचेच नाही, फोन उचलायचेच नाही. कारण सांगत राहायची, हाही एक घोटाळाच झाला. खऱ्या आयुष्यात आम्ही अशा घोटाळ्यांचा सामना करत असतो”, असेही शशांकने म्हटलं आहे.