Sayaji Shinde on Sahar Sheikh : ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेखने म्हणालेल्या, “हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करुन टाकू. मुंब्रातून विरोधकांना पळवून लावू आणि इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल”, या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या ‘मुंब्रा हिरवा करू’ या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली. तसंच मराठी मनोरंजन विश्वातूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील एका व्हिडीओद्वारे टोला लगावलेला पाहायला मिळाला. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे.
मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबरच सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धनाचं कामदेखील करतात. देवराईच्या निमित्ताने ते वृक्षसंवर्धनाचं काम करताना दिसतात. अशातच जुन्नर तालुक्यात सयाजी शिंदे देवराईच्या कामानिमित्त पोहोचले होते. यावेळी TV9 शी साधलेल्या संवादात त्यांनी देवराईबद्दल त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील पहिली देवराई ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जुन्नर तालुक्यातून सुरु करत आहे. संतांचे जे दुर्लक्षित विचार राहिले, ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. इथे सध्या एक हजार झाडं लावली असून आणखी १० हजार झाडं लावायची आहेत”.
यानंतर त्यांनी सद्यस्थितीच्या राजकरणाविषयीही भाष्य केलं ते म्हणाले, “मला राजकारणातलं काही कळत नाही आणि त्यात रसही नाही. हजारो वर्षांपासून राजकारण चालू आहे आणि ते आजही चालत आलंय. आज काय नवीन नाही. कुठलाही रंग कुणाच्या बापाचा नाही. सगळे रंग हे निसर्गाच्या बापाचे आहेत. निसर्ग आपलं मुळ आहे आणि त्यात सगळेच रंग आहेत. ते कुणालाच तयार करता येत नाहीत. ते निसर्गातूनच येतात. ते फक्त झाडातूनच येतात”.





