Siddhivinayak Temple Controversy : मंदिरातील देणगी प्रकरणावरुन सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. राम मंदिरातील देणगी प्रकरणावरुन विधान परिषदेत जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर सरकारला धारेवर धरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पलटवार केला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुणालाही सोडणार नाहीत. पण जे आज टीका करत आहेत, त्यांच्या सरकारच्या काळात सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटी लुटली गेली होती. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? मी पुराव्याशिवाय बोलत नाही. सिद्धीविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराबाबतच्या बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या,” असे म्हणत त्यांनी एक जुनी बातमी दाखवत आपल्या आरोपांना आधार असल्याचा दावा केला. तत्कालीन ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर एकतर्फी शिंदेंनी निशाणाच साधला.
या प्रतिक्रियेनंतर आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, “मी सध्या वारीमध्ये आहे. त्यामुळे नेमकं काय बोललं गेलं, ते व्यवस्थित पाहिलेलं नाही. मात्र, माझा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत मंदिराचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडे होता. साडेतीन ते चार वर्षांपूर्वी हाच विषय विधी आणि न्याय विभागाकडे अधिवेशनात आला होता. सिद्धीविनायक मंदिरातील कार्यकारी अधिकारी आणि वित्त अधिकारी यांची नियुक्ती मंत्रालयातून केली जाते. त्यामुळे या काळात कोणताही गैरव्यवहार झाला असेल, तर तो सरकारने जाहीर करायला हवा.
“कुठल्यातरी बातमीच्या आधारावर काहीतरी आरोप करण्यात अर्थ नाही. जर खरंच काही गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. गेल्या साडेतीन वर्षांत कोण अध्यक्ष होते, हे सर्वांना माहिती आहे. त्या काळात कागदपत्रांमध्ये फेरफार झाला असेल, तर त्याचाही तपास व्हायला हवा. या चौकशीत कुणीही दोषी आढळलं, अगदी मी स्वतः जरी दोषी ठरलो, तरी मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या. पण पुरावा नसताना खोटे आरोप करू नका. आमच्या कार्यकाळातील प्रत्येक गोष्ट वेळोवेळी जाहीर केली आहे. विधी आणि न्याय विभागाकडे सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. काही चुकीचं आढळत असेल, तर जरूर कारवाई करा”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याची तब्येत खालावली, कीटक चावल्याचे निमित्त, प्रचंड वेदना, ताप आणि…
पुढे ते म्हणाले, “उगाच धूर दिसला म्हणून आग लागली, असं समजू नका. व्यवस्थित आणि पारदर्शक कारभार करा. स्वतःचे गैरव्यवहार लपवण्यासाठी इतरांवर आरोप करून लोकांची दिशाभूल करू नका. काही चुकीचं आढळलं, तर संबंधितांवर कठोर कारवाई करा. माझा सहा वर्षांचा कार्यकाळ होता. त्यातील पहिली तीन वर्षे भारतीय जनता पक्षाचे सदस्यही माझ्यासोबत विश्वस्त म्हणून काम करत होते. त्या काळातील प्रत्येक बैठकीची कागदपत्रे, मंजुऱ्या आणि निर्णय मंत्रालयाकडे आहेत. त्यामध्ये काही फेरफार झाले असतील, तर त्याची माहिती मला नाही. पण माझ्या नावाचं एक जरी चुकीचं व्हाउचर आढळलं, तरी माझ्यावर कारवाई करा.”
आणखी वाचा – “बापाला मरताना नाही पाहायचंय”, ‘सैराट’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, वडिलांची प्रकृती गंभीर आणि…
शेवटी ते असंही म्हणाले की, “आजही मी गणपती बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो, इतका स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आम्ही केला आहे. त्यामुळे कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करू नयेत, हीच माझी विनंती आहे”.





