samir choghule : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे ज्यात अनेकदा एखादी बातमी वाऱ्यासारखी पसरते. बरेचदा कलाकारांबाबत वाईट वा चांगल्या गोष्टीही तुफान व्हायरल होतात. अनेकदा कलाकारांच्या निधनाच्या अफवाही पसरतात. पण अर्थातच ही वाईट बाब आहे की चुकीच्या आणि तेही निधनाच्या बातम्या पसरवणं. यावर अनेकदा त्या कलाकारांनी भाष्य करत खरपूस समाचारही घेतला आहे. अशातच या मुद्द्यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानेही भाष्य केलं आहे. नेहमीच त्याच्या विनोदी शैलीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता समीर चौघुलेने या विषयावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
समीर चौघुले यांनी ‘MHJ Unplugged’ या पाॅडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक किस्से सांगितले. यावेळी त्यांनी मृत्यूची खोटी बातमी पसरलेली याबाबतही भाष्य केलं. पाॅडकास्टचे होस्ट अमित फाळके यांनी त्यावेळी नेमकं काय झालेलं?, असं समीर यांना विचारलं. यावर समीर चौघुले म्हणाले की, “हे दुसऱ्यांदा झालंय, एकदा पण अशीच बातमी पसरली होती. करोना काळात आम्ही ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका केली. ती मी लिहायचो पण आणि त्यात मी कामसुद्धा करायचो. त्याचं शुटींगच सुरु होतं”.
आणखी वाचा – वाईट कमेंट्स, घाणेरडे रील आणि…; ट्रोलिंगवर मराठमोळी मायरा वायकुळ स्पष्टच बोलली, म्हणाली, “खूप भयानक…”
पुढं ते म्हणाले, “त्यामुळे मी माझ्या मोबाईलवरच शूट करायचो, म्हणून मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवलेला. आधीच कोणीतरी आपल्या ग्रुपवर हे टाकलेलं आणि सगळीकडे ते पसरलेलं. सई मला फोन करत होती, तिने मला पहिल्यांदा सांगितलं की सम्या मला तुझा फक्त आवाज ऐकायचा होता. मी काय झालं म्हटलं, मला काहीच माहित नाही. ती म्हणाली, ते ग्रुपवर आलंय असं-असं, पाहिलं नाहीस का तू? आणि मग त्यानंतर सरांचा फोन आला. मग त्या माणसाने सांगितलं चूक झाली. त्यानंतर त्याने काढली ती पोस्ट”, असं समीर यांनी पुढे सांगितलं.
सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक छगन चौघुले यांचं करोनामध्ये निधन झालं होतं. त्यामुळे छगन चौघुलेंना आदरांजली देण्याऐवजी समीर चौघुलेंचा फोटो वापरुन ही खोटी बातमी पसरवली होती. अर्थात अशा गंभीर चुका होणं हे लज्जास्पद आहे.





