Nitin Desai Suicide Case : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. पण त्याचपूर्वी काही राजकीय मंडळींनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. आता या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केला आहे. याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. (Jitendra Awhad On Nitin Desai)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचं घोषित केलं. आता या प्रकरणाला एक वेगळं मिळण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी धक्कादायक गौप्य स्फोट केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रसेल शाह यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. रसेल शाह एडलवाईज कंपनीचा मालक त्याचा जर या प्रकरणाशी संबंध असेल तर त्यालाही जेलमध्ये टाका”. त्याचबरोबर आव्हाड यांनी नितीन देसाई यांना काही लोक छळत असल्याचंही म्हटलं.
ते म्हणाले, “त्याचबरोबरीने नितीन देसाई यांना कोणी कोणी छळलं हे त्यांच्या जवळच्या मित्रांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे. याच्याशी गुजरातचं वगैरे काहीही कनेक्शन नाही. सगळं मुंबईच्या एमएमआरडीएशी रिजनशी कनेक्शन आहे”. आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर नितीन देसाई आत्महत्येप्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहावं लागेल.