छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या या कार्यक्रमाचे तिसरे पर्व चर्चेत आहे. अनेक राजकारणी, कलाकार मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमातील त्यांची वक्तव्ये तसेच त्यांच्या या मुलाखती विशेष लोकप्रियता मिळवतात. आता या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी उपस्थिती लावली. यादरम्यान त्यांच्याशी करण्यात आलेल्या बातचीत वरून अनेक प्रश्नांची उत्तर समोर आली. त्यांच्या मुलाखतीचे अनेक प्रोमो समोर येतं आहेत, यांतील एक प्रोमो पाहून हसू जरी आले असले तरी मुद्दा पाहता तो गांभीर्याचाच विषय म्हणावा लागेल.
मुख्यत्वे अमली पदार्थांचा शोध घेण्यात माहीर असलेल्या समीर वानखेडे यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की, “परदेशातून कोकिन्स सारखे ड्रग्ज हे आणले जातात. तेव्हा गुन्हेगार ते ड्रग्ज कॅप्सूल मध्ये टाकून शरीरात त्याच सेवन करतात, सेवन करणं हा खरंच प्रॉब्लेम नाही आहे, तर ते शरीराबाहेर काढणं हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे प्रकरण एक दिवसात आटपतही नाही, त्याला चार पाच दिवस जातात. आणि आम्हाला त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्याकडून हे पदार्थ काढून घ्यावे लागतात. आणि शरीराबाहेर काढताना ही मीच त्यांच्या समोर उभा राहतो.” (Sameer Wankhede Statement)
शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बरंच गाजलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबियांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या सगळ्या प्रकरणात एक नाव बरंच चर्चेत आलं ते म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे. समीर यांनी या प्रकरणामध्ये कारवाई केली होती. भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळं समीर वानखेडे अडचणीत आले होते. तसंच, काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहित माझ्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी पत्रात लिहलं होतं.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात, दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोक म्हणतात, असा प्रश्न जेव्हा केला तेव्हा समीर म्हणाले, “आमच्यासाठी हे गुन्हेगार खूप लहान आहेत आणि त्यांचे नाव घेऊन मी त्यांना अजिबात फेमस करणार नाही. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाहीआणि मी त्यांना आव्हान देतो. तिथे परदेशात बसून धमक्या वगैरे देऊ नकोस हिम्मत असेल तर समोर येऊन धमक्या दे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.