शेक्सपिअरने सांगितलंय की नावात काय आहे? हे वाक्य सहज कोणाच्या ना कोणाच्या तोंडी आपण फार आधीपासूनच ऐकत आलो आहोत. आज अचानक या वाक्याची आठवण झाली ती अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरमुळे. चिन्मयने त्याच्या लेकाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं. बरं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न. त्याने त्याच्या खासगी आयुष्यात काय करावं आणि काय करु नये हे सांगणारे आपण कोणीच नाही. किंबहूना त्याच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याचा अधिकारही कोणाला नाही. पण मुलाच्या नावावरुन त्याला व त्याच्या कुटुंबियांना अनेकांनी नको नको ते सुनावलं. चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकरत नसता तर तुम्ही शांत बसला असता का? असाही प्रश्न उभा राहतो.
प्रेक्षक आहात म्हणून कलाकारांनी तुम्हाला सगळे अधिकार दिलेले नाहीत. जर तुमच्या नावावरुन कलाकारांनी तुम्हाला डिवचलं तर चालेल का? नाही ना! मग हाही अधिकार कुणालाही दिलेला नाही. आपल्याकडे अनेक नावं आहेत. बॉलिवूडचे आघाडीचे संगीतकार ए. आर. रहमान हे पूर्वीचे ए. एस. दिलीपकुमार. भलेही त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार वेगळा धर्म स्वीकारला असेल. पण आज इतकी वर्षे बॉलिवूडची गाणी करूनही एकही वाक्य ते हिंदीत कधीच बोलले नाहीत, बोलतही नाहीत. मग त्यांना कधीच कोणी जाब विचारत नाही.
महाराष्ट्रातही जहांगीर आर्ट गॅलरी आहेच ना… त्या आर्ट गॅलरीमध्ये हेच ट्रोलर्स डोळे अगदी मोठे करुन जातात. सागरिका घाटगेने तर झहीर खानबरोबर लग्न केलं. दुसरीकडे शिबानी दांडेकर फरहान अख्तरसह संसार थाटू लागली. हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण त्यांना कोणीच काही बोललं नाही मग फक्त चिन्मय मांडलेकरच का?
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही या मराठी कलाकारासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जे ट्रोल करत आहेत त्यांनी कॅमेऱ्यासमोर किंवा रंगमंचावर एक वाक्य तरी नीट धड बोलून दाखवावं. पण ते त्यांच्याकडून होणार नाही. कसं आहे ना! की, मागून सगळेच नावं ठेवायला तयार असतात, पण तोंडावर बोलायची कोणाचीही तितकी हिंमत नाही.
पुलंनी म्हटलंय ना “आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं.” अगदी तशीच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. असं असेल तर या ट्रोलर्सविरुद्ध अँटी ट्रोलर्ससुद्धा तयार झाले पाहिजेत. जे या ट्रोलर्सवर अंकुश ठेवतील. कारण कुटुंबाच्या कुटुंब आणि करिअरसुद्धा उध्वस्त करणारे हे ट्रोलर्स एकप्रकारे सोशल मीडियाचे व्हायरसच म्हटले पाहिजेत आणि त्यांना अँटी ट्रोलर्ससारख्या अँटीव्हायरसचीच गरज आहे.
आणखी वाचा – “लोकांची लायकी नाही आणि…”, चिन्मय मांडलेकर प्रकरणावर गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “कलाकाराला असं वागवणं…”
एखाद्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊन दबावाखाली कोणतीही व्यक्ती आपलं आयुष्यही संपवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे हाही एकप्रकारे हकनाक गेलेला बळी ठरू शकतो. याला जबाबदार कोण? आणि हे सगळं कुठवर जाईल. ही भविष्यातील भीषण सत्यता आहे. त्यामुळे थांबवा आता हे प्रकरण आणि चिन्मय व चिन्मयच्या कुटुंबियांना सुखाने जगु द्या…