‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील घराघरात आपली जागा निर्माण केली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारही घराघरात प्रसिद्ध झाले. २०१४ साली सुरु झालेल्या कार्यक्रमाने तब्बल १० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी निलेश साबळे याने सांभाळली होती. त्याने केलेले लेखन, सूत्रसंचलन हे प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत होते. या कार्यक्रमातील भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे यांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मात्र १० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. (nilesh sabale on chala hawa yeu dya party celebration)
या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून निलेशने काम पाहिले. मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर निलेश ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, या कार्यक्रमामध्ये दिसून आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निलेशने ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने आधीच्या कार्यक्रमाबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
‘चला हवा…’ या कार्यक्रमाला जेव्हा १० वर्ष पूर्ण झाली तेव्हा सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पार्टीमध्ये निलेश मात्र कुठेही दिसला नव्हता. यामुळे निलेश न आल्याने सर्वच ठिकाणी चर्चाना उधाण आले होते. यावरच आता निलेशला प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल आता निलेश दिलखुलासपणे व्यक्त झाला आहे. “ ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या शेवटच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित नव्हतात तर तिथे उपस्थित न राहण्याचे कारण काय होते?”, त्यावर निलेशने उत्तर दिले की, “जेव्हा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा माझी तब्येत खराब होती”.
पुढे तो म्हणाला की, “मला सतत काही ना काही होत असतं. त्यावेळी माझी तब्येतदेखील बिघडली होती. त्यावेळी मला येण्याचे आमंत्रणही मिळाले होते. पण त्याक्षणी मला नाही जमलं. माझ्या न येण्यामुळे खूप गैरसमजदेखील झाले होते. ते होणं स्वाभाविकही होतं. पण सगळ्यांनी सेलिब्रेट केले आणि मला बोलावलं नाही असं मात्र काहीही नव्हतं”.
त्याच्या या उत्तराने निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लागला आहे. दरम्यान सध्या त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाचे लेखन व सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्याबरोबर भाऊ कदम, ओंकार कदम, स्नेहल शिदम हे देखील काम करताना दिसत आहेत.