झी मराठी वहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या ना?’ या शोने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या शोची व या शोमधील कलाकारांची चर्चा ही नेहमीच होताना दिसते. या शोमधून कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडेसारख्या अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यात काही वेळाने नव्याने सहभागी झालेला सदस्य म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय व मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२८ जून २०१९ रोजी अंकुरचा विवाह पार पडला होता. लग्नाचे काही खास फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची माहिती दिली होती. मात्र अंकुरच्या या लग्नाचा एक वेगळाच किस्सा आहे. स्वत: अभिनेत्याने याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले आहे. वीणा जगतापला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. यावेळी वीणाने अंकुरला “तुझ्या आयुष्यात वहिनींची एंट्री कशी झाली?” असा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचे उत्तर देत अंकुरने असं म्हटलं की, “ती माझ्या सख्ख्या मामाची मुलगी आहे आणि आमचं पूर्णत: अरेंज मॅरेज आहे. म्हणजे आमचं इतकं अरेंज मॅरेज आहे की, मी पाहण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा गेलो नव्हतो. लग्नाआधी माझं एक अफेअर होतं आणि हे अफेअर दीड वर्षांचं होतं. या दीड वर्षांत आम्ही फक्त तीनदा भेटलो होतो. एकदा थिएटरमध्ये, दुसऱ्यांदा मंदीरात आणि तिसऱ्या वेळेस मी थेट तिला घरी घेऊन गेलो.”
यापुढे त्याने असं म्हटल की, “तिला घरी घेऊन गेल्यानंतर आईने आम्हाला “आम्ही लग्न करणार आहोत का?” असा प्रश्न विचारला. मात्र आंतरजातीमुळे तिने लग्न करण्याला नकार दिला. कारण ती घरातली मोठी मुलगी होती आणि बाबांना हे कळलं तर त्यांना अटॅक येईल असं ती म्हणाली. मग ती गेल्यावर माझ्या आईने आम्हाला आमचे रिलेशन थांबवण्याचा सल्ला दिला. मग काही दिवसांनी माझ्या एका जिवलग मित्राने प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्या केली आणि यामुळे माझ्या आईने माझ्या लग्नाचा विचार केला.”
यापुढे त्याने म्हटलं की, “लग्न करताना मी एक अट घातली की, मी जसा आहे तसा स्वीकार करणारी मुलगी असेल तरच मी लग्न करेन. मग आम्ही माझ्या वाहिनीच्या सल्ल्याने व्हिडीओ कॉल केला आणि या कॉलवर मी तिला माझ्या सगळ्या सवयींबद्दल सांगितले. जर हा असेल तर आत्ताच हो बोल नसेल तर नाही. तुला कुणी काही बोलणार नाही आणि जर हे तूला जमात नसेल तर तुझ्यावतीने मी बोलतो. पण तसं काही नव्हतं आणि मग आमचं लग्न झालं.”