Kangana Ranaut childhood : कलाकार मंडळींचा स्ट्रगल काही त्यांना चुकलेला नाहीये. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांचा कुणीही वारसा हक्क नसताना त्यांनी सिनेविश्वात स्वतःच नाव स्थापन केलं. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजेच बॉलीवूड क्वीन कंगना रनौत. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत कंगनाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं, कंगनाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, ती कोणत्याही ट्रोलिंगला न जुमानता तिनं वेळोवेळी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. कंगना ही मूळची हिमाचल प्रदेशची. मंडी या जिल्ह्यातील एका लहान गावात तिचा जन्म झाला. आई-वडिलांची ती दुसरी मुलगी. कंगनाला एक मोठी बहीण आणि एक धाकटा भाऊ आहे. कंगनाला एक मोठा भाऊही होता पण त्याचे अवघ्या जन्माच्या दहाव्या दिवशीच निधन झाल्याचं तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी कंगनाने तिला उशिरा आलेल्या मासिक पाळी बद्दल आणि कुटुंबातील गरोदर महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत नसल्याबद्दलचा खुलासा देखील केला आहे.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “माझ्या आईला पहिला मुलगा झाला होता, पण तो दगावला, जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तो गेला. माझ्या वडिलांनी त्याचे नाव हिरो ठेवले होते, त्यामुळे त्याला गमावणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्याचा जन्म रुग्णालयात झाला होता, त्याचं वजन ३.५ किलो होतं आणि त्याला कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला, असं माझ्या आईला वाटत होते. त्यांनी त्याची नाळ चुकीच्या पद्धतीने कापली, असं तिचं म्हणणं होतं.
कंगना पुढे म्हणाली, “या घटनेनंतर माझी आजी म्हणाली की यानंतर आईची प्रसूती रुग्णालयात होणार नाही. या घटनेनंतर, माझ्या आईला तीन अपत्ये झाली, काकूला दोन अपत्ये झाली. आम्हा सर्व भावंडांचा जन्म एकाच घरात, एकाच खोलीत झाला. कुणालाच रुग्णालयात नेण्याची परवानगी नव्हती”. मासिक पाळी उशीरा आल्याने आईने बाहुल्या फेकून दिल्या होत्या, हा प्रसंग कंगना रणौतने सांगितला. “माझ्या सर्व मैत्रिणींना सहावी ते नववीच्या दरम्यान मासिक पाळी आली, पण मला आली नव्हती. त्यामुळे माझ्या आईला काळजी वाटत होती. त्यावेळी मला बाहुल्यांचं वेड होतं. माझ्याकडे खूप साऱ्या बाहुल्या होत्या. एके दिवशी, माझी आई खूप रागावली. ‘आधीच तुला मासिक पाळी आलेली नाही आणि हिला अजूनही बाहुल्यांशी खेळायचंय,’ असं म्हणत तिने त्या फेकून दिल्या होत्या”.
आणखी वाचा – ‘३ इडियट्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शेवटी कंगना म्हणाली, “बाहुल्यांमुळे मला पाळी वेळेवर येत नसल्याचं तिला वाटत होतं. मग एके दिवशी, मी सकाळी उठले तेव्हा मला रक्ताचे डाग दिसले. मी घाबरले होते, पण माझी आई आनंदी होती की मला अखेर मासिक पाळी सुरू झाली”.





