अर्जुन रामपाल हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. २००१ साली त्याने ‘मोक्ष’ या चित्रपटातून अभिनय करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जगा निर्माण केली. मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या अर्जुनचे कुटुंब हे सैन्यातील होते. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर तो त्याच्या आईबरोबर राहू लागला. त्याने अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर पुढे त्याने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने मॉडेलिंग सोडून त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा मॉडेलिंगपासून ते अभिनयापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. त्याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे. (arjun rampal on struggling days )
नुकताच त्याने ‘पॉप डायरीज’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला त्याच्या वाईट प्रसंगाबद्दल विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले की, “आपण आपल्या संघर्षाचे दिवस लक्षात ठेवत नाही. जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा तुम्ही ते सर्व विसरू इच्छिता. पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून तुम्ही घाबरत असता”.
पुढे त्याने सांगितले की, “तो एक यशस्वी मॉडेल होता. अशोक मेहता माझ्याकडे ‘मोक्ष’ हा चित्रपट घेऊन आले होते. यामध्ये माझ्याबरोबर अभिनेत्री मनीषा कोइरालादेखील होती. त्यावेळी माझे करियरदेखील चांगले सुरु होते. मी मनीषाबरोबर चंबळच्या खोऱ्यात शूट करत होतो. तेव्हा अचानक एक गर्दी माझ्या समोर आली आणि मला स्वतःबद्दल तिरस्कार होऊ लागला. तेव्हा मी विचार केला आणि म्हणालो हे देवा, हे सर्व भयंकर आहे. मी आता यापुढे मॉडेलिंग करणार नाही असा विचार केला. हा चित्रपट बनवण्यासाठी सहा वर्ष लागतील असा विचारदेखील मी केला नव्हता”.
पुढे त्याने मॉडेलिंगच्या दिवसाबद्दल सांगितले की, “मी तेव्हा अंधेरी येथे राहायचो. तेव्हा माझा वाईट काळ सुरु होता आणि माझ्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. तेव्हा माझे घरमालक सरदार होते त्यांनी माझी खूप मदत केली. ते दर महिन्याच्या पहिल्या तारखेला यायचे आणि विचारायचे की ‘नाही आहेत?’ म्हणजे पैसे नाहीत का? तेव्हा मी मान हलवून नाही म्हणायचो. त्यावर तू तर देशीलच असे म्हणून निघून जायचे. ते खूप चांगले होते. तुम्हाला आयुष्यात असे प्रसंग येणे गरजेचे असते”.
तसेच त्याने सांगितले की, “मी नंतर घर बदलले. सरदारजींचे घर मला परवडत नव्हते. माझ्याकडे तेव्हा दोन कुत्रे होते. मी स्वतः शाकाहारी खायचो आणि कुत्र्यांना मांसाहारी जेवण द्यायचो. माझ्याबरोबरच असे का घडत आहे असा विचार मी करायचो पण असे होणे गरजेचे असते”.
त्याने ‘दिल है तुम्हारा’, ‘दिल का रिश्ता’, ‘रावण’, ‘हिरोईन’, ‘ओम शांती ओम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.