लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरासह राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आतापासूनच राडा सुरू झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच एका कार्यक्रमात खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चालू भाषणातून काढता पाय घेतला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील वढू तुळापूर येथील धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. पण कार्यक्रम पत्रिकेवर खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांचे नावच नव्हते. अमोल कोल्हे कोल्हे व आमदार पवार यांना या कार्यक्रमात दुय्यम स्थान दिले गेले. त्यामुळे अमोल कोल्हे व पवार यांनी कार्यक्रम अर्धवट सोडला. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे भाषणाला उभे राहताच अमोल कोल्हे हे स्टेजवरुन कार्यक्रम सोडून निघून गेले. खासदार अमोल कोल्हे अचानक कार्यक्रम सोडून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली.
आणखी वाचा – शाळेत प्रवेश, धमाल-मस्ती अन्…; बहुचर्चित ‘आठवी अ’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, दुसरा भाग कधी येणार?
याबद्दल अमोल कोल्हेंनी एबीपी माझाला त्यांची प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी असं म्हटलं की, “मुळात या कार्यक्रमासाठी मला रात्री उशिरा निमंत्रण मिळाले. कार्यक्रमामधील फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना स्थान देण्यात आलेलं नाही. फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत”. तसेच या कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याची टीकाही कोल्हेंनी केली.
दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कुणी अमोल कोल्हेंच्या या कृतीचे समर्थन केले आहे, तर कुणी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्याचे पहीला मिळत आहे.