बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असून सध्या ते आराम करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण हे सर्व खोटं असल्याचं खुद्द अमिताभ यांनी खुलासा करुन हे सर्व खोटं असल्याचे सांगितले आहे. अशातच अभिषेकचं एक जुनं पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Abhishek bachchan viral letter)
अमिताभ हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असतात. ते रोज एखादा विचार चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी २०१९ मध्ये एक ट्विट केले होते.यामध्ये त्यांचा मुलगा व अभिनेता अभिषेक बच्चन याने लिहिलेले पत्र आहे. अभिषेकने हे पत्र तेव्हा लिहिले होते जेव्हा अमिताभ हे चित्रीकरणामुळे घरापासून लांब राहत असत. त्यांनी हे पत्र शेअर करत त्यामध्ये ‘पूत सपूत तो क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय’ ही सुप्रसिद्ध ओळ लिहिली होती.
व्हायरल झालेल्या पत्रामध्ये लिहिले होते की, “प्रिय बाबा, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही लवकर परत या. मला तुमच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे आहे. त्यासाठी मी प्रार्थना करत आहे. देव आमची प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही काळजी करु नका. मी आई, श्वेता ताई व घराची काळजी घेत आहे. आय लव्ह यू, तुमचा लाडका मुलगा”.
अमिताभ व जया यांनी १९७३ मध्ये लग्न केले. दोघांनाही अभिषेक व श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याने ‘रेफ्यूजी’ या चित्रपटातून करीना कपूरबरोबर पहिल्यांदा दिसला. त्यानानंतर त्याने ‘धूम’, ‘कुछ ना कहो’, ‘गुरु’, ‘दसवी’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिषेक नेहमी आपल्या वडिलांबद्दल कौतुक करताना दिसून येतो. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझ्या वडिलांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. पण माझी तितकी इच्छा नाही. कोणीही अशी महत्त्वाकांक्षा ठेऊ शकत नाही आणि कोणी ठेऊपण नये. कारण हे शक्य नाही. तसेच त्यांच्यासारखा व्यक्ती १०० वर्षातून एकदाच जन्म घेतो”.
अभिषेकचे पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.