अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. अनेक चित्रपटांना ‘पुष्पा-२’ने मागे टाकले आहे. तसंच हा चित्रपट अनेकांची वाहवा मिळवत आहे. असं असलं तरी चित्रपटाच्या सुरुवातीपासून अनेक वाद होताना पाहायला मिळत आहेत. प्रीमियरच्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाल्याने शुभारंभालाच गालबोट लागले. एका महिला चाहतीचा सिनेमागृहाबाहेरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर टीका झाली आणि आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना घरात घुसून मारण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे.
‘पुष्पा-२’मध्ये महत्त्वाचं पात्र आहे ते म्हणजे भैरव सिंग शेखावत. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणाऱ्या या पात्राच्या आडनावावरुन आता करणी सेना आक्रमक झाली आहे. निर्मात्यांनी चित्रपटात असलेलं शेखावत हे आडनाव बदलावं अन्यथा मार खाण्याची तयारी ठेवावी असा आक्रमक पवित्रा करणी सेनेने घेतला आहे. राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी रविवारी ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंधाना यांचा हा चित्रपट क्षत्रियांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुष्पा 2 फ़िल्म मे “शेखावत” का नेगेटिव किरदार, फिर से क्षत्रियों का अपमान, तैयार रहे करणी सैनिक, जल्द फ़िल्म निर्माता की ठुकाई की जाएगी। @aajtak @ABPNews @ZeeNews @VtvGujarati @BBCBreaking @CNNnews18 @timesofindia @TimesNow @htTweets @EconomicTimes @FinancialTimes @JagranNews… pic.twitter.com/vsbm2r3OLL
— Dr. Raj Shekhawat (@IAMRAJSHEKHAWAT) December 8, 2024
चित्रपटामध्ये फहाद फैसीलने भवर सिंह शेखावत नावाची पोलीस अधिकाऱ्याची नकारात्मक भूमिका साकारली आहे. याच भूमिकेवर आता करणी सेनेच्या नेत्यांची आक्षेप नोंदवला आहे. शेखावत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, “पुष्पा २ मध्ये शेखावत नाव असलेल्या व्यक्तीची नकारात्मक भूमिका दाखवण्यात आली आहे. हा क्षत्रीयांचा अपमान आहे. करणी सैनिक तयार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या निर्मात्यांना चोप दिला जाईल,” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, थाटामाटात पार पडलं केळवण, फोटो व्हायरल
“या चित्रपटाने क्षत्रियांचा अपमान केला आहे. शेखावत समाजाला नकारात्मक दृष्टीकोनातून दाखवण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली इंडस्ट्री शेखवत समाजाला बदनाम करत आहे. त्यांनी आता पुन्हा तेच केलं आहे,” असं राज शेखावत यांनी म्हटलं आहे. “या चित्रपटामध्ये वारंवार वापरण्यात आलेला शेखावत शब्द निर्मात्यांनी वगळावा. नाहीतर करणी सेना त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेल. गरज पडल्यास आम्ही काहीही करु शकतो” असा इशारा राज शेखावत यांनी दिला आहे.