अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या तिसऱ्या चंद्र दिवशी येते आणि शाश्वत समृद्धीचे प्रतीक आहे. संस्कृतमध्ये ‘अ’ म्हणजे ‘नाही’ आणि ‘क्षय’ म्हणजे अंत किंवा क्षय, ‘अक्षय’ म्हणजे कधीही न संपणारे, अमर्याद किंवा कधीही कमी होणार नाही असे काहीतरी. ज्या दिवशी भगवान परशुराम (भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी एक) यांचा जन्म झाला होता. सत्युगानंतर सुरू होणारा त्रेतायुगाचा हा पहिला दिवस आहे. याच मंगल दिवशी, अनेक वर्षांनी सुदामा आपला बालपणीचा मित्र, भगवान श्रीकृष्ण यांना भेटायला गेला. सुदामा अत्यंत गरिबीने त्रस्त होता. रिकाम्या हाताने येण्याऐवजी त्याने भगवान श्रीकृष्णाला सर्वात साधा भात अर्पण केला, त्या बदल्यात त्याला भरपूर संपत्ती आणि आनंद मिळाला. तो दिवस आहे जेव्हा महान ऋषी, वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. पुरी जगन्नाथजीमध्ये वार्षिक रथयात्रेची तयारी सुरू होते. अक्षय्य तृतीया हा तो पवित्र दिवस आहे, ज्या दिवशी पांडवांना त्यांच्या वनवासाच्या काळात अक्षय्य पत्र भेट देण्यात आले होते.
सामान्यत: हा दिवस अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करून साजरी केली जाते. कारण ते समृद्धीचे प्रतीक आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, जी संपत्तीसाठी सर्वोत्तम आहे. या दिवसाची अनेक धार्मिक महत्त्व आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी, ब्राह्मण भोजन घालावे. याशिवाय गरजूंनासुद्धा काहीतरी दान करावे, त्यांनाही अन्नदान करावे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
असेही मानले जाते की, अक्षय्य तृतीयेला चांदी किंवा हिरादेखील खरेदी करू शकतात. अक्षय्य तृतीयेला हे दागिने खरेदी केल्याने घरात संपत्तीची कमतरता जाणवत नाही. शिवाय पैशाने घरचे भांडार भरलेले राहतात. आता भांडार म्हणजे अर्थातच आपले कपाट किंवा तिजोरी ही आपसूकच आली नाही का? अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र अवश्य खरेदी करावे. श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते, आर्थिक भरभराट होते. पण आधी ते यंत्र गंगाजलाने शुद्ध करावे आणि नंतर त्यावर काही अक्षता, हळदी कुंकू लावून आणि मगच तिजोरीत ठेवावे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर सोने खरेदी करता येत नसेल, तर त्याऐवजी बार्लीदेखील खरेदी करू शकता. बार्ली खरेदी करून लक्ष्मीला अर्पण केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते. तसेच देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर आपल्या कुटुंबियांवर, आपल्या नोकरी तसेच व्यवसायावर आणि घरावर राहते.
अक्षय्य तृतीयेला पिगी बँकदेखील खरेदी करू शकता. यामध्ये रोज संध्याकाळी कामावरून परत येताना पूजेनंतर थोडे पैसे ठेवावेत आणि ही बँक पूजा खोलीत देवी लक्ष्मीच्या मागे किंवा शेजारी ठेवावी. या दिवशी क्रिस्टल टर्टल, लाफिंग बुद्धादेखील खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या सर्वांची खरेदी केल्याने माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येते. एवढेच नाही तर, प्रगतीचे मार्गही खुले होतात.
आणखी वाचा – अर्जुन-सायलीमध्ये दुरावा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर होणार का वेगळे?, तर साक्षीचा चैतन्यवर संशय
अक्षय्य तृतीया पूजा मंत्र : संपत्ती वाढवण्यासाठी कुबेर मंत्राचा जप करावा. तो जप म्हणजे “कुबेर त्वं धनाधीश गृहे ते कमला स्थिता, तंव देवीं प्रेषयाशु त्वं मद्गृहे ते नमो नम:” हिंदू धर्मात असे मानले जाते की अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ असतो आणि कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी विशेष मुहूर्ताची आवश्यकता नसते. हा दिवस सर्व सिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणूनच या दिवशी दान देणे, गरजूंना अन्नदान करणे आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे अशा प्रकारची जितकी चांगली कामं करता येतील तितकी करावीत. म्हणजे आपल्या आयुष्यातील, घरातील संकटे कमी होतात. लक्ष्मीदेवी आणि कुबेर प्रसन्न होऊन पैसे, सुबत्ता येऊन सर्व ठप्प व्यवहार मार्गी लागतात. खऱ्या अर्थाने समृद्धी होते.