मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी मालिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या त्यांच्या अभिनयाबरोबरच ग्लॅमरस लुकसाठी व त्यांच्या उत्तम नात्यासाठी कायमच चर्चेत असतात. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियावरही तितक्याच चर्चेत राहत असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक डान्स व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक महत्त्वपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ऐश्वर्या नारकर या प्राणीप्रेमी असून त्यांचे मांजरींवर प्रचंड प्रेम आहे आणि हे प्रेम त्यांनी अनेकदा व्यक्त देखील केले आहे. त्यांच्या घरी अनेक मांजरी असून या मांजरींचे व मांजरींच्या पिल्लांचे संगोपनही त्या करतात. त्याचबरोबर अनेकदा त्यांनी मांजरींबरोबरचे काही व्हिडीओ शेअर करत असतात. असाच मांजरींचा व त्यांच्या काळजीबाबत चिंता व्यक्त करणारा एक व्हिडीओ ऐश्वर्या यांनी शेअर केला आहे. पावसामुळे अनेकदा हे प्राणी आश्रयासाठी गाडीखाली किंवा गाडीच्या बोनेटमध्ये वगैरे जाऊन बसतात आणि आपल्या नकळत या मुक्या प्राण्यांचा जीव जातो. याबद्दल सतर्कता कशी राखावी काय काळजी घ्यावी म्हणून ऐश्वर्या यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “काल जरा एक गोंधळ झाला. म्हणून आवर्जून हा व्हिडीओ करत आहे, माझी गाडी काल सर्व्हिस सेंटरमध्ये गेली होती. एक-दोन तासांनी मला तिथून फोन आला. “तुमच्या आजूबाजूला काही मांजरं आहेत का?” असं त्यांनी मला विचारलं. तर मी त्यांना “हो खूप आहेत? काय झालं?” असं त्यांना मी विचारलं. यावर त्यांनी “तुमच्या गाडीत काही मांजरांची छोटी पिल्ले सापडली आहेत” असं सांगितलं. हे ऐकून माझ्या पोटात गोळाच आला कारण त्या आदल्या रात्री एका मांजरीने तीन पिल्लांना जन्म दिला होता आणि ती सुरक्षित राहावी म्हणून त्यांना आम्ही बॉक्समध्ये ठेवलं होतं, कारण पावसा-पाण्याचे दिवस आहेत. पण ती पिल्लं कधी माझ्या गाडीत गेली हे कळलंच नाही. त्यानंतर गाडी चौदा-पंधरा किलोमीटर चालली तरीही त्या पिल्लांना काही झालं नाही ही अक्षरश: देवाची कृपा आहे”.
आणखी वाचा – Video : निलेश साबळे सेटवर स्वतः करत आहे भाऊ कदम व ओंकार भोजनेचा मेकअप, नव्या शोसाठी मेहनत, व्हिडीओ व्हायरल
यापुढे ऐश्वर्या यांनी असं म्हटलं की, “मग सर्व्हिस स्टेशनच्या माणसाने त्या बाळांना आणलं आणि त्यांना त्यांच्या आईला भेटवलं. आता ती सगळी पिल्ले सुरक्षित आहेत. पण यावरुन मला सांगायचं आहे की, पावसाचे दिवस आहेत, तुमच्या आजूबाजूला मांजरांची पिल्ले असतील, कुठल्या मांजराने पिल्ले दिली असतील तर कृपया गाडी सुरु करायच्या आधी बोनेट उघडून, लाइट लावून त्यात पिल्ले आहेत की नाही हे बघा. गाडीच्या खालीसुद्धा बघा, कारण आपल्याला कळत नाही आणि नकळत या पिल्लांचा जीव जातो. तर कृपया ही काळजी घ्या”.