ashok saraf padma shri : सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच मनाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आज देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आजवर अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. गेली अनेक दशक ते अविरतपणे सिनेविश्वात काम करत आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सगळंच काही सांगून गेला. उत्तम अभिनेते बनण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना हा करावा लागला. तरीही कुठेही कमी न पडता आलेल्या संकटावर मात करत त्यांनी त्यांचा स्वतःच असं साम्राज्य उभं केलं.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफ यांनी ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला Exclusive मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीतील कठीण काळाबाबत भाष्य केलं. अशोक सराफ म्हणाले, “तुम्हा सगळ्यांना माझा अभिमान वाटतोय यातच माझा आनंद आहे. मी हे जे काही करतोय ते सगळं तुमच्यासाठीच करत आहे. आपण लोकांना किती आनंद देऊ शकतो आणि त्यांना किती आनंद मिळतो हे अधिक महत्त्वाचं असतं. मी कुठेतरी थोडा का होईना यशस्वी झालो याचा मला आनंद आहे. कुठल्या प्रसंगाने मी निराश झालो असं कधी झालं नाही. कारण मी याकडे कधी लक्षच दिले नाही. मला जे करायचं आहे त्याचाच मी विचार केला. मी काय करतोय याला अधिक प्राधान्य मी दिलं”.
पुढे ते म्हणाले, “माझा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा माझ्यावर मोठं संकट ओढवलं होतं. परिस्थिती इतकी गंभीर होती की, मी हलूच शकत नव्हतो. अशा परिस्थितीवर मात करणं खूप आव्हानात्मक होतं. त्यावेळेला ती परिस्थिती पाहून मी थोडासा घाबरलो होतो, पण मी त्या प्रसांगावरही मात केली. माझी मान हलत नव्हती, अशा परिस्थितीत काय करायचं पुढे हा प्रश्न होता. पण मी योग्य तो व्यायाम करुन ते ठीक केलं”.
शेवटी त्यांनी या कठीण काळातील त्रासदायक गोष्टीचा उल्लेख करत म्हटलं की, “लोकांना असं वाटतं होतं की, बहुतेक हा संपला आता. काही लोकांनी तर बोलूनही दाखवलं. पण असा मी संपणार नाही हे मी मनाशी पक्के केलं आणि मी पुन्हा त्याच जोमाने उभा राहिलो. यांत माझे सहा महिने गेले. सहा महिन्यात माझ्या हातातील सगळे चित्रपट गेले, पण त्यातून बाहेर येत मी सगळं उभं केले. माझ्या प्रेक्षकांचा सपोर्ट आणि माझी जिद्द याने हे साध्य झालं”.