मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची एक मराठमोळी लाडकी जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. काही दिवसांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकली. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांमधील प्रेमही फुलत गेलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही या चर्चांबद्दल काहीही भाष्य केलं नाही. त्यानंतर थेट साखरपुडा सोहळा उरकत दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. (Prasad Jawade and Amruta Deshmukh)
घरच्या घरी साखरपुडा सोहळा उरकत दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. प्रसाद-अमृताने १८ नोव्हेंबर रोजी अगदी थाटामाटात विवाहसोहळा उरकला. अमृता-प्रसादच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. दोघांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर ही जोडी त्यांच्या संसारात रमलेली दिसली. दोघेही लग्नानंतरचे सण साजरे करतानाही दिसले.
अमृता-प्रसाद ही जोडी त्यांच्या लग्नानंतर बरीच चर्चेत असते. अमृता आयुष्यात आल्यावर प्रसाद जवादेमध्ये किती बदल झाला याबाबत नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने भाष्य केलं आहे. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “हो. माझ्यात बदल झाला आहे. मी खूप फिट झालो आहे. बायको जेव्हा तुमच्या आयुष्यात येते तेव्हा निश्चितच बदल घडतात तसेच बदल माझ्या आयुष्यात घडले आहेत. आणि सर्व काही छान सुरु आहे”.
अमृता व प्रसाद यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, अमृता सध्या रंगभूमीकडे वळली आहे. अमृता नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. तर प्रसाद सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेत प्रसाद मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरु असून चित्रीकरणामुळे तो सध्या घरापासून दूर आहे.