बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन हे सध्या अधिक चर्चेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. पण शुक्रवारी त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. काहीं तासानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना घरी आणण्यात आले आहे आणि प्रकृतीही स्थिर असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थनाही केल्या. (amitabh bachchan update)
शुक्रवारी त्यांना हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यात आले होते. पण ही शस्त्रक्रिया त्यांच्या हृदयावर झाली नसून पायामध्ये क्लॉट असल्याने पायाची शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले. पण अशातच आता त्यांच्या या सर्व वृत्तावर स्वतः अमिताभ यांनी मौन सोडले आहे. शस्त्रक्रियेच्या वृत्तानंतर ते सायंकाळी अभिनेता अभिषेक बच्चन व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर आयएसपीएल टी १०’ मॅचचा आनंद घेताना दिसले. त्यांना बघून चाहते मात्र संभ्रमात पडले. नक्की त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली की नाही यावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर आता अमिताभ यांनी खुलासा केला आहे.
मॅच झाल्यानंतर तिथून निघत असताना मीडियाने त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील पत्रकारांनी त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले. हे ऐकून ते थोडे थांबले आणि म्हणाले ‘खोटी बातमी. हे ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अमिताभ यांच्या आरोग्यविषयक बातमीबद्दल गोंधळ झाला असला तरीही चाहत्यांना मात्र ते सुखरूप असल्याचे ऐकून दिलासा मिळाला आहे. सध्या अमिताभ अनेक चित्रपटांमध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये ‘सेक्शन ८४’, ‘कल्की २८९८-AD’, ‘आंखे २’ व ‘तेरा यार हू मै’ या चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी ते अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यादरम्यान कुटुंबासमवेत दिसले होते. तेव्हा ते सर्व कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागीही झाले. मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी ‘वनतारा’बद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.