छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शोने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमध्ये राजकीय, मनोरंजन, खेळ यासह प्रत्येक क्षेत्रातील खास व्यक्तींनी हजेरी लावली आहे. मात्र या शोमध्ये यायला बॉलिवूडमधील एका कलाकाराला तब्बल दहा वर्षी लागली आहेत आणि हा अभिनेता म्हणजे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान. आमिर खान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणा म्हणून दिसणार आहे. आमिर पहिल्यांदाच कपिल शर्माच्या शोमध्ये आला आहे.
आमिर खान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आगामी भागामध्ये सहभागी होणार असून या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्याची झलक पाहिल्यानंतर हा भाग मजेशीर असणार असल्याचे दिसत आहे. या भागात आमिर खान त्याच्या शेवटच्या दोन फ्लॉप चित्रपटाबद्दल तसेच अवॉर्ड शोबद्दलच्या त्याच्या नापसंतीबद्दलदेखील बोलणार आहे. याशिवाय तो त्याच्या मुलांबद्दल बोलणार आहे, जे त्याचे अजिबात ऐकत नाहीत.
आमिरचे रीना दत्ता व किरण राव यांच्याशी लग्न झाले होते. परंतु आता तो त्याच्या दोन्ही पत्नींपासून घटस्फोटित आहे. घटस्फोटानंतरही तो त्याच्या दोन्ही पत्नींचा चांगला मित्र आहे. अमीरला त्यांच्या पहिल्या पत्नीपासून जुनैद नावाचा मुलगा आहे आणि किरण रावपासून आयरा व आझाद अशी दोन मुलं आहेत. मात्र त्याची मुलं त्याचं अजिबात ऐकत नसल्याचे त्याने या प्रोमोमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून कपिल व अर्चनासह सगळे प्रेक्षक हसायला लागतात.
दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये तो ‘माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत” असं म्हणतो. तसेच या प्रोमोच्या शेवटी कपिलने आमिरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही एक मोठा प्रश्नही विचारला आहे. यावेळी कपिलने आमिरला विचारले की, “तो आयुष्यात सेटल होण्याचा विचार करत आहे का?” मात्र, यावर अभिनेत्याने नेमके काय उत्तर दिले हे या आगामी भागामध्येच कळेल.