‘आई कुठे काय करते’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेच्या कथानकाने आजवर प्रेक्षकवर्गाला एकत्र बांधून ठेवलं आहे. गेली सव्वाचार वर्ष सुरु असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेच्या कथानकाने साऱ्या प्रेक्षकवर्गाची उत्सुकता नेहमीच वाढवून ठेवली आहे. अशातच मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे ही मालिका एका वेगळ्या वळणावर सुरु आहे. (Onkar Govardhan On Madhurani Prabhulkar)
मालिकेत आजवर आलेल्या अनेक रंजक वळणांमुळे ही मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेलीही पाहायला मिळाली. मालिकेत सध्या आशुतोष केळकर या पात्राचा प्रवास संपलेला पाहायला मिळाला. आशुतोषचा मालिकेत मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातात आशुतोषचा मृत्यू दाखवण्यात आला असून अरुंधतीवर खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं. मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून अनेकांनी आशुतोषला मिस करत असल्याचं म्हटलं. तर कलाकार मंडळींनीही आशुतोष म्हणजेच ओंकारला मिस करणार असल्याचं म्हटलं.
अशातच मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधती हिने ओंकारसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. मधुराणीने सीनदरम्यानचे एकत्र फोटो शेअर करत असं म्हटलं की, ““मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही पोस्ट उशिराने करतेय. आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाही. कसं आवडेल. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीत पण त्या स्वीकाराव्या लागतात. तसंच आशुतोषच जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. अरुंधती आशुतोषला मिस करत आहे तशीच आम्हा सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येत आहे. ओंकार आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, नव्वदीतील गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातील तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब, हे सगळं मिस करत आहे. पुढे परत काम करुच. पण हा प्रवास कायम स्मरणात राहील”, असं म्हटलं.
अरुंधतीच्या या पोस्टवर ओंकारनेही कमेंट करत मिस करत असल्याचं म्हटलं. ओंकारने कमेंट करत म्हटलं, “मधुराणी मला पण तुझी आठवण कायम येईल.आपण एकत्र खूप चांगलं काम केलं. पुन्हा आपण एकत्र काम करुच. तोपर्यंत पुन्हा लवकरात लवकर भेटण्याची आशा आहेच. प्रेम व सदिच्छा”, असं म्हटलं आहे.